Jijau created Shiv Rai:

जिजाऊंनीच शिवरायांची जडणघडण केली : अजित पवार

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या. त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे, या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करुन स्वराज्याची उभारणी केली, असे ठामपणे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे अप्रत्यक्षपणे खंडण केले.  

 राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित ‘स्वराज्य सप्ताह’ कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतिने १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल ,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, मंत्री धर्मरावबाबा अत्राम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्षाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ आदी उपस्थित होते.

 रविवारी आळंदी येथे गीता-भक्ती अमृत महोत्सव सोहळ्याला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे काम केले, असे विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिजाऊंनी शिवाजी महाराजांची जडणघडण केली, असे ठामपणे सांगत योगींच्या विधानाचे अप्रत्यक्षपणे खंडण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायमच शिवाजी महाराजांच्या ‘रयतेचे राज्य’ या संकल्पनेतून प्रेरणा घेतली, असे सांगत आपण बहुजनवादी विचारधारेसोबत कायम असल्याचे संकेत अजित पवार यांनी यावेळी दिले. या मेळाव्यात योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे अप्रत्यक्ष खंडन करून अजित पवार यांनी लाल महालमधील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याच्या वादापासून त्यांनी घेतलेली भूमिका भाजपसोबत राजकीय युतीत गेल्यानंतरही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

यापूर्वीही अजित पवार यांनी महायुतीत येण्याअगोदर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते ही भूमिका मांडली होती. त्यामुळे शिवरायांच्या इतिहासबद्दलची आपली सामाजिक भूमिका ठाम आहे, हे अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मताचे अप्रत्यक्षरित्या खंडन करून ती बाब अधोरेखित केली. शेतकरी हा शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला, म्हणून म. फुले यांनी त्यांना कुळवाडीभूषण म्हटले. महिलांचे रक्षण हे राजसत्तेचे काम आहे, शिवरायांचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होते. त्यांच्या राज्यात धर्म, जात, वर्ग याला थारा नव्हता.

आता योगी आदित्यनाथ यांनी समर्थ आणि शिवरायांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर अजित पवार यांनी आपली भूमिका मांडताना शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन ते समतेचा संदेश देणारे राजा होते, शेतकऱ्यांचे कल्याण करणारे राजा होते, लोककल्याण ही शिवरायांची राज्यनीती होती हे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

समर्थ रामदास स्वामी नव्हे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते- प्रशांत महाराज मोरे देहूकर

दरम्यान, समर्थ रामदास स्वामी नव्हे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते”, असा दावा प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी केला. ते संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज आहेत.

प्रशांत महाराज मोरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोविंदगिरी महाराजांची तीव्र निषेध केला. तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते, असा प्रतिदावा प्रशांत महाराज मोरेंनी केला. त्यांनी यासाठी एका अभंगाचा दाखला ही दिला. “प्रशांत महाराज मोरे देहूकरांची ही वैयक्तिक भूमिका आहे”, असं संत तुकाराम महाराजांच्या संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं. मात्र देवस्थानने अद्याप त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *