It is painful that Udayanaraje's candidature has not been announced

Supriya Sule On Udayanraje : उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न होणे ही बाब वेदनादायी – सुप्रिया सुळे

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

#Supriya Sule On Udayanraje — देशभरामध्ये छत्रपतींच्या गादीचा मान राखला जातो. उदयनराजे जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा त्यांचा मानसन्मान राखला जायचा, कोणत्याही बैठकीला उदयनराजे उपस्थित राहिले असता, त्यांची बसण्याची व्यवस्था ही शरद पवारांच्या शेजारी केली जायची. मुलाप्रमाणे उदयनराजेंना शरद पवारांनी जीव लावला. तेवढेच प्रेम आणि जिव्हाळा उदयनराजेंनीदेखील लावला. मात्र, भाजपकडून या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात असून, उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न होणे ही बाब वेदनादायी आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपला शरद पवार यांना संपवायचं आहे. भाजप सुडाचं राजकारण करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी खडकवासला मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर आणि सांगलीच्या  जागांवरून वाद सुरू आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “देशभरामध्ये पाचशेहून अधिक लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा लढवण्यासाठी महाविकास आघाडी  एकत्रित येत असेल, तर काही जागांवरती वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये लोकशाही असून, सामंजस्याने याच्यावरती तोडगा काढण्यात येईल. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे  गट आणि काँग्रेसकडून ज्या पद्धतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेदेखील उमेदवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच जाहीर करतील, असे त्या म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीतमध्ये राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी निश्चित आहे. याबाबत फक्त अधिकृत घोषणा करणं बाकी आहे. त्यातच बारामतीमध्ये तुमच्या मनातील उमेदवार असेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नुकतेच पुण्यामध्ये केले होते.

मी माझ्या मोठ्या भावाला इतके कष्ट दिले नाहीत

“बारामतीमध्ये मी तिकिट मागितलं आहे. मी निवडणूक लढणार आहे. मग मी दुसऱ्यांच्या घरामध्ये कशाला डोकावू? अजितदादा माझ्यासाठी प्रचार करत होता तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला इतके कष्ट दिले नाहीत”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.

बारामती  मतदारसंघातील दादांच्या गाठीभेटीविषयी सुळे म्हणाल्या, देशात लोकशाही आहे, त्यामुळे कोणी कोणाच्या भेटीगाठी घ्यायच्या याचे स्वातंत्र्य असून, प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. त्यानुसार दादा भेटीगाठी घेत आहेत. मात्र, मला आनंद एकाच गोष्टीचा आहे की, दादा जेव्हा माझ्यासाठी प्रचार करत होते, तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला एवढे कष्ट दिले नाहीत, याचे मला समाधान आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोला लगावला.

बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून गेली १५ वर्षे मी काम करत आहे. मी ६ महिन्यांपूर्वीच तिकिटासाठी पक्षासह महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडे विनंती केली होती. माझ्या कामगिरीवरून तिकिट मिळेल याचा विश्वास आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“भारतीय जनता पक्षाला विकासासाठी नाही तर शरद पवार यांना संपविण्यासाठी निवडणूक लढवायची आहे. त्यांना बेरोजगारी हटवायची नाही, महागाई कमी करायची नाही. भाजप सूडाचे राजकारण करत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. माझ्या सगळ्यांशी गाठीभेटी होतात. त्यासाठी मला निवडणूक असण्याची गरज वाटत नाही. मी २४ तास आणि ३६५ दिवस लोकांमध्येच असते. मला ऊर्जा आणि आनंद लोकांमधूनच मिळतो”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दादा संपर्क करून धमकावत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्यात का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारला असता सुळे म्हणाल्या, प्रश्न विचारण्यात येत आहेत. यातच सर्व काही आलं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे या आरोपांना दुजोरा दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *