खोटी आकडेवारी देऊन साखर कारखान्यासंदर्भात आरोप केले जात आहेत – अजित पवार

राजकारण
Spread the love

पुणे–महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. अनेकदा उत्तर देणे मी टाळले. आज मी वस्तुस्थिती समोर यावी म्हणून बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, पण त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. खोटी आकडेवारी साखर कारखान्यासंदर्भात देऊन आरोप केले जात आहेत. एकजण म्हणतो साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला, दुसरा म्हणतो 10 हजार कोटींचा घोटाळा झाला. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. साखर कारखान्यांच्या विक्रीची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पडल्याचा दावा करतानाच हे कारखाने किती किंमतीला विकले गेले, याचा सविस्तर तपशीलच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषदेत मांडला.

ते शुक्रवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. अनेक साखर कारखान्यांची सरकारी यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये काहीही निष्पन्न झालेले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील 65 कारखाने हे दुसऱ्या कंपन्यांनी चालवायला घेतले आहेत अथवा ते विकण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, राज्यातील वेगवेगळे 30 सहकारी साखर कारखाने राज्य शिखर बँकेने विकले. जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहा सहकारी साखर कारखाने विकले. राज्य सरकारच्या परवानगीने सहा सहकारी साखर कारखाने विकण्यात आले. तीन सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले. बारा सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चालवण्यास देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील 64 सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेले आहेत किंवा एकाने विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिले आहेत किंवा भाडेकरारावर चालवले जात असल्याचे अजित पवार म्हणाले.

सतत माझ्या कुटुंबांचा जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत सतत उल्लेख केला जातो. लोकांना मला एवढेच सांगायचे आहे की जिल्हा बँकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर साखर कारखान्याने थकलेले पैसै न भरल्यामुळे कारखान्याचा ताबा घेतला. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमधे कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याचे सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने म्हटल्याचे अजित पवारांनी सांगितले. अजित पवार म्हणाले की, नियम हे सर्वांना सारखेच आहेत. सगळी कागदपत्रे घेऊन आज आलो आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला आणि तो कुणी घेतला याची यादीच आज जाहीर केली. अनेक कारखाने स्वत: सरकारनेच 3 ते 5 कोटी विकल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून देत साखर कारखाने आम्ही मातीमोल भावाने विकले कसे म्हणता? असा सवालही केला. 2013 लातूरचा प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना 69 कोटी 75 लाखाला विकला गेला. लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याने या कारखान्याची खरेदी केली. सर्वाधिक किंमती विकल्या गेलेला हा कारखाना आहे. तर, 2013मध्ये नागपूरचा श्रीराम सहकारी साखर कारखाना 11 कोटी 97 लाखाला विकण्यात आला. कोल्हापूरच्या व्यंकटेश्वरा प्रॉजेक्ट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला. हा कारखाना सर्वात कमी किंमतीत विकला गेल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील साखर कारखानदारी बद्दल खूप काही बोललं गेलं. खूप बातम्या आल्या. या गोष्टीला 12 ते 15 वर्ष झाले या बातम्या येत असताना मी उत्तर देत नव्हतो. पण आता अतिरेक झाला आहे म्हणून उत्तर देत आहे. त्याकाळात 25 हजार कोटी, काहींनी 10 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे नवीन सरकार आलं त्यांनी सीआयडीला चौकशी करायला लावली. त्यात काही निष्पन्न झालं नाही. एसीबीने चौकशी केली. त्यातही स्पष्ट झालं नाही. सहकार विभागानेही चौकशी केली. त्यातही काही निष्पन्न झालं नाही, असं पवार यांनी सांगितलं. तसेच 65 साखर कारखाने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विकले गेले तर काही चालवायला दिले गेले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 64 सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कंपनीने विकत घेतले. काही लोकांनी चालवायला घेतले तर काहींनी इतरांना चालवायला दिले. पण काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले होते. या आरोपांना अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात माझ्या नातेवाईकांवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जरंडेश्वर कारखाना सर्वप्रथम मुंबईस्थित गुरु कम्युनिटी कंपनीने विकत घेतला होता. त्यानंतर हा कारखाना बीव्हीजी समूहाच्या हणमंत गायकवाड यांनी विकत घेतला होता. त्यासाठी हणमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली होती. मात्र, तोटा झाल्याने त्यांनी हा कारखाना दुसऱ्या कंपनीला विकून टाकल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

नो कॉमेन्टस् म्हणण्याचा आधिकार मला आहे की नाही?

अमंली पदार्थ विरोधी विभागाची सुरू असलेली कारवाई आणि त्यावर मंत्री नवाब मलिक घेत असलेल्या आक्षेपांबाबत विचारल्यानंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करीत मलिकांचे प्रश्‍न त्यनांच विचारा, असे सांगत कितीही आग्रह केला तरी या विषयावर आपण बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. नो कॉमेन्टस् म्हणण्याचा आधिकार मला आहे की नाही? असा प्रश्‍न त्यांनी केला.

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले, मी मागेपणं सांगितलेलं आहे. कोणी असं म्हटलं तसं म्हटलं त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. मला एक अधिकार आहे ना नो कॉमेंटस म्हणायचा अधिकार आहे की नाही. आहे की नाही, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे तसा मला नो कॉमेंटस म्हणायचा अधिकार आहे की नाही. मी आपल्याला जे काही सांगायचं ते सांगितलं आहे. तुमचा ही वेळ घालवू नका, माझाही वेळ घालवू नका. मी सांगतो ते ऐकून घ्या, तुम्हाला तुमचंच खरं करायचं असेल तर मी उठून जातो, तुम्हाला काय चालवायचं आहे ते चालवा, अशा शब्दात अजित पवार यांनी नवाब मलिक आणि एनसीबी, आर्यन खान प्रकरणी संताप व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *