राज्य मंडळाच्या वतीने ही पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत यशस्वीपणे घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ५२,८८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने मंडळाने यावर्षी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. पात्र असूनही नियमित मुदतीत अर्ज भरू न शकल्यामुळे ज्या खाजगी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात होते, अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेत प्रविष्ट होण्याची विशेष संधी देण्यात आली होती. परीक्षेचा निकाल आज दुपारी १.०० वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, शाळांना एकत्रित निकाल डाऊनलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
विभागीय निकालाचा विचार करता, नाशिक विभागाने ४१.४५ टक्के निकालासह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल नागपूर (३९.४२%), लातूर (३४.५५%), छत्रपती संभाजीनगर (३४.२७%), अमरावती (३०.३६%) आणि पुणे (२३.९९%) या विभागांचा क्रमांक लागतो. कोल्हापूर विभागाचा निकाल १८.५३% आणि मुंबई विभागाचा निकाल १७.७३% लागला असून, कोकण विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच १२.२६ टक्के लागला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी घटल्याचे दिसून येते; कारण २०२४ मध्ये हा निकाल ३६.७८% आणि २०२५ मध्ये ३६.४८% इतका नोंदवण्यात आला होता.
या परीक्षेसाठी राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. भरारी पथकांच्या माध्यमातून गैरप्रकारांना आळा घालण्याचे कडक प्रयत्न करण्यात आले, ज्यामुळे तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पडली. तसेच, परीक्षेस बसलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सर्व आवश्यक सवलती देण्यात आल्या होत्या.
निकालानंतरच्या प्रक्रियेसाठी मंडळाने सविस्तर वेळापत्रकही जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांना १५ जुलै ते २४ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये, तर छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क आकारले जाईल. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य असून, ती मिळाल्यापासून पाच कार्यालयीन दिवसांच्या आत प्रति विषय ३०० रुपये शुल्क भरून अर्ज करावा लागेल. हे सर्व शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.
या परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली श्रेणी सुधारण्यासाठी ‘श्रेणी/गुणसुधार’ योजनेअंतर्गत पुढील सलग तीन संधी (फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७ आणि फेब्रुवारी-मार्च २०२८) उपलब्ध राहतील. तसेच, फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या नियमित परीक्षेसाठी पुनर्रपरीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी आणि आयटीआय द्वारे क्रेडिट ट्रान्सफर घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे राज्य मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांनी अभिनंदन केले असून, परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.











