नवी दिल्ली: भारताने आपल्या सुरक्षा धोरणात एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा बदल करत १२ अण्वस्त्रे ‘रेडी टू युज’ म्हणजेच तात्काळ वापरासाठी सज्ज असलेल्या मोडवर तैनात केली आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) या जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या २०२६ च्या ताज्या अहवालात ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अण्वस्त्रे अशा प्रकारे प्रत्यक्ष ऑपरेशनल मोडमध्ये ठेवण्यात आली असून, हे पाऊल भारताच्या सामरिक रणनीतीतील एक मोठा बदल मानले जात आहे.
यापूर्वी भारताची रणनीती अशी होती की, शांततेच्या काळात अण्वस्त्रे आणि ती वाहून नेणारी क्षेपणास्त्रे वेगवेगळी ठेवली जात होती आणि केवळ युद्धाच्या भीषण परिस्थितीतच ती एकत्र केली जात असत. मात्र, आता ही १२ अण्वस्त्रे भारताच्या ‘न्यूक्लियर ट्रायड’ला सोपवण्यात आली आहेत. न्यूक्लियर ट्रायड म्हणजे अशी लष्करी क्षमता ज्याद्वारे एखादा देश जमीन, आकाश (लडाखू विमाने) आणि पाणी (अण्वस्त्र सज्ज पाणबुड्या) या तिन्ही ठिकाणांहून अण्वस्त्र हल्ला करू शकतो. जमिनीखालील क्षेपणास्त्र सायलो आणि समुद्राच्या खोलीत लपलेल्या अण्वस्त्र सज्ज पाणबुड्यांमध्ये ही शस्त्रास्त्रे आता कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी हाय-अलर्टवर ठेवण्यात आली आहेत.
भारताने उचललेले हे पाऊल चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील वाढत्या आव्हानांना दिलेले चोख प्रत्युत्तर मानले जात आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, चीनची विस्तारवादी वृत्ती, एलएसीवरील वाढता दबाव आणि पाकिस्तानची अस्थिरता पाहता भारताला आपली अण्वस्त्र क्षमता अद्ययावत करणे अनिवार्य झाले होते. चीनकडे भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त अण्वस्त्रे असून तो भारतीय सीमेजवळ क्षेपणास्त्र तळ उभारत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे ‘नो फर्स्ट युज’ धोरण नाही आणि त्यांनी विशेषतः भारतासाठी ‘नासर’ सारखी छोटी टॅक्टिकल अण्वस्त्रे विकसित केली आहेत. अशा परिस्थितीत शत्रू राष्ट्रांनी कोणतीही आगळीक करू नये, यासाठी ‘प्रतिरोधक’ म्हणून भारताने ही तैनाती केली आहे.
या धोरणामध्ये भारताच्या सागरी ताकदीचा, विशेषतः ‘आयएनएस अरिहंत’ सारख्या अण्वस्त्रवाहू पाणबुड्यांचा मोठा वाटा आहे. या पाणबुड्या भारताला ‘सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी’ (दुसऱ्या हल्ल्याची क्षमता) प्रदान करतात. याचा अर्थ असा की, जर शत्रू देशाने अचानक अणुहल्ला करून जमिनीवरील सर्व लष्करी तळ नष्ट केले, तरी समुद्राच्या तळाशी लपलेल्या या पाणबुड्या शत्रूला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवतात.
अण्वस्त्रांची ही तैनाती म्हणजे भारताच्या अण्वस्त्र धोरणात बदल झाला आहे असा नाही. भारत आजही आपल्या दोन जुन्या तत्त्वांवर ठाम आहे: पहिले म्हणजे ‘नो फर्स्ट युज’, म्हणजेच भारत कोणत्याही देशावर स्वतःहून आधी अणुहल्ला करणार नाही आणि दुसरे म्हणजे ‘क्रेडिबल मिनिमम डेटरन्स’, ज्याचा अर्थ अण्वस्त्रांचा वापर केवळ शत्रूच्या अणुहल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच केला जाईल.
जागतिक क्रमवारीत अण्वस्त्र तैनात असलेल्या देशांच्या यादीत भारत आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. सिप्रीच्या अहवालानुसार, रशिया १७९६ तैनात अण्वस्त्रांसह पहिल्या, तर अमेरिका १७७० शस्त्रांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फ्रान्स (२८०), ब्रिटन (१२०) आणि चीन (३४) यांचा क्रमांक लागतो. आता भारत १२ तैनात अण्वस्त्रांसह या शक्तिशाली देशांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताने ‘शांतता ही केवळ बोलण्याने नाही, तर शक्तीने प्राप्त होते’ हा संदेश या तैनातीतून स्पष्टपणे दिला आहे.













