RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: स्थापनेपासून राष्ट्र उभारणीपर्यंतचा १०० वर्षांचा प्रवास

Rashtriya Swayamsevak Sangh: A 100-year journey from its inception to nation-building
Rashtriya Swayamsevak Sangh: A 100-year journey from its inception to nation-building

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आपल्या स्थापनेची शताब्दी साजरी करत आहे. २७ सप्टेंबर १९२५ रोजी विजयादशमीच्या दिवशी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपुरात केवळ पाच सहकाऱ्यांसह लावलेले हे राष्ट्रप्रेमाचे छोटेसे रोपटे आज ८० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या ५५,००० शाखांच्या विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हे मूळ तत्त्व मानून जात, पंथ किंवा भाषेच्या पलीकडे जाऊन संघाची वाटचाल सुरू आहे. या शंभर वर्षांच्या प्रवासात संघावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळातील संघर्ष ते स्वातंत्र्योत्तर राष्ट्र उभारणीतील योगदान यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप.


 

स्वातंत्र्यलढ्यातील संघर्षाचा पाया: डॉ. हेडगेवारांचे बालपण आणि तारुण्य

संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत लहानपणापासूनच प्रज्वलित होती. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी, व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या ६० व्या वर्षपूर्तीनिमित्त शाळेत वाटण्यात आलेली मिठाई त्यांनी घरी आणून फेकून दिली, कारण त्यांच्या मते, “याच इंग्रजांनी आपल्या भोसले घराण्याचे राज्य संपवले”. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी किंग एडवर्ड सातव्याच्या राज्याभिषेक सोहळ्यावरही बहिष्कार टाकला. इतकेच नव्हे, तर नागपूरच्या सीताबर्डी किल्ल्यावरील ब्रिटिश ‘युनियन जॅक’ खाली खेचण्यासाठी त्यांनी मित्रांसोबत आपल्या शिक्षकाच्या घरातून एक भुयार खोदण्याचा धाडसी प्रयत्नही केला होता, जो नंतर उघडकीस आला.


“संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय”: तुरुंगवास आणि सत्याग्रह

१९०५ मध्ये ‘वंदे मातरम’ घोषणेवर बंदी असताना, १९ वर्षांच्या केशवरामांनी शाळेत मोठ्या आवाजात ‘वंदे मातरम’ म्हटले. माफी मागण्यास नकार दिल्याने त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. हाच बाणेदारपणा त्यांच्या पुढील कार्यातही दिसला. १९२१ मध्ये, ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर “आक्षेपार्ह” आणि प्रक्षोभक भाषणे दिल्याबद्दल देशद्रोहाचा खटला दाखल केला. न्यायालयात त्यांनी निर्भीडपणे प्रश्न विचारला, “एका देशाने दुसऱ्या देशावर राज्य करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला? आम्हाला ‘संपूर्ण स्वातंत्र्या’ पेक्षा कमी काहीही नको आहे”. यासाठी त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली. सुटकेनंतर त्यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमाला पंडित मोतीलाल नेहरूंसारखे नेते उपस्थित होते.

अधिक वाचा  डॉ. हेडगेवारजींचा स्वातंत्र्यलढा : 100 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक महान क्रांतिकारी व स्वातंत्र्य सेनानी पूज्य डॉ. हेडगेवार यांची कारागृहातून सुटका झाली.

१९३० मध्ये महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीला प्रतिसाद म्हणून, विदर्भात झालेल्या प्रसिद्ध ‘जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. हेडगेवार यांनी केले. त्यांनी १०,००० सत्याग्रहींसह या आंदोलनात भाग घेतला, ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.


भारत छोडो’ आंदोलन आणि क्रांतिकारकांना आश्रय

१९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या नेतृत्वाखाली संघाच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. विदर्भातील चिमूर-आष्टी येथील आंदोलन हे याचे उत्तम उदाहरण आहे. याच काळात सिंध प्रांतातील हेमू कलानी या तरुण संघ स्वयंसेवकाने ब्रिटिश सैन्याच्या रेल्वे मार्गाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, ज्यासाठी त्यांना १९४३ मध्ये फाशी देण्यात आली. काँग्रेसचे सदस्य गणेश बापूजी शिणकर यांनी नमूद केले आहे की, १९४२ च्या आंदोलनात भूमिगत कार्यकर्त्यांना भांडवलदार आणि जमीनदार आश्रय देण्यास घाबरत असताना, संघ कार्यकर्त्यांनी त्यांना आपल्या घरात सुरक्षित आश्रय दिला आणि त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली.

इतकेच नाही, तर अनेक मोठ्या क्रांतिकारकांसाठी संघाची घरे सुरक्षित आश्रयस्थान बनली होती. सॉन्डर्सच्या हत्येनंतर राजगुरू नागपुरात आले असता, डॉ. हेडगेवार यांनी त्यांच्यासाठी उमरेड येथील एका फार्महाऊसवर राहण्याची सोय केली होती. प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली भूमिगत असताना दिल्लीचे संघचालक लाला हंसराज यांच्या घरी १०-१५ दिवस राहिल्या होत्या. तसेच, नाना पाटील आणि अच्युतराव पटवर्धन यांसारख्या नेत्यांनाही संघ कार्यकर्त्यांनी आपल्या घरी आश्रय दिला होता. संघाच्या वाढत्या प्रभावामुळे ब्रिटिश गुप्तचर विभाग (CID) देखील चिंतित होता आणि त्यांच्या अहवालांमध्ये संघाच्या देशव्यापी विस्तारावर चिंता व्यक्त केली होती.

अधिक वाचा  #Srimad Bhagavad Gita and Journalism : राष्ट्राची वीण घट्ट होईल, असे वार्तांकन गरजेचे : डॉ. मनमोहन वैद्य

स्वातंत्र्योत्तर राष्ट्र उभारणीतील दुर्लक्षित योगदान

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही दादरा, नगर हवेली आणि गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. २ ऑगस्ट १९५४ रोजी संघाच्या स्वयंसेवकांनी सिल्वासा येथे पोर्तुगीज ध्वज उतरवून भारताचा तिरंगा फडकावला आणि तो प्रदेश भारत सरकारकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे, तिथे भगवा ध्वज नव्हे, तर तिरंगा फडकावण्यात आला होता, जो संघाच्या संविधानिक निष्ठेचे प्रतीक आहे. १९६१ मध्ये, गोवा मुक्तीसाठी तत्कालीन सरकारने लष्करी कारवाईस नकार दिल्यानंतर, जगन्नाथ राव जोशी यांच्या नेतृत्वाखाली हजारो स्वयंसेवकांनी गोव्यात प्रवेश करून आंदोलन केले. या दबावामुळेच अखेरीस लष्करी कारवाई झाली आणि गोवा मुक्त झाला.

याशिवाय, काश्मीरच्या भारतात विलीनीकरणातही संघाची महत्त्वाची भूमिका होती. सरदार पटेलांच्या आग्रहावरून तत्कालीन सरसंघचालक गुरु गोळवलकर यांनी महाराजा हरिसिंह यांची भेट घेऊन त्यांना भारतात विलीन होण्यासाठी तयार केले होते.


संकटात सेवेचा अखंड वसा

१९४७ च्या फाळणीवेळी स्वयंसेवकांनी सीमेवर पहारा दिला आणि पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी ३,००० हून अधिक मदत शिबिरे उभारली. १९६२ च्या भारत-चीन युद्धावेळी सीमेवर सैन्याला रसद पुरवणे आणि जखमींची सेवा करण्याच्या कामामुळे प्रभावित होऊन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी संघाला १९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते, ज्यात ३,५०० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. १९६५ च्या भारत-पाक युद्धावेळी दिल्लीतील वाहतूक व्यवस्था स्वयंसेवकांनी सांभाळली होती. १९८४ च्या शीख विरोधी दंगलीत अनेक शीख बांधवांना आपल्या घरात आश्रय देऊन त्यांचे प्राण वाचवले. आणीबाणी, भोपाळ वायू दुर्घटना, किंवा गुजरात, उत्तराखंडमधील भूकंप असो, प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत संघाने मदतकार्यात पुढाकार घेतला आहे.

अधिक वाचा  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीला पुण्यात प्रारंभ

विचारधारा आणि सत्यता: आरोपांचे खंडन

संघावर अनेकदा ‘मुस्लिम विरोधी’ असल्याचा आरोप होतो. मात्र, संघाच्या मते, “स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात अभिमान बाळगणे म्हणजे इतर धर्माचा अनादर करणे नव्हे”. ज्याप्रमाणे स्वतःच्या आई-वडिलांचा आदर करणे म्हणजे इतरांच्या पालकांचा द्वेष करणे होत नाही, त्याचप्रमाणे हे तत्त्व आहे. राष्ट्रवादी मुस्लिमांना एकत्र आणण्यासाठी संघाने २००२ मध्ये ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’ची स्थापना केली होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही म्हटले आहे की, “मुसलमानांशिवाय भारताची कल्पनाच केली जाऊ शकत नाही”.

‘हिंदू राष्ट्रा’ची संकल्पना ही भौगोलिक किंवा राजकीय नसून एक सांस्कृतिक ओळख आहे, असे संघाचे मत आहे. तसेच, संघ संविधानाचा सन्मान करतो आणि देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच कायद्याचे, म्हणजेच समान नागरी संहितेचा (UCC) सर्वात मोठा समर्थक राहिला आहे.

आज १०० कोटी हिंदू नव्हे, तर १४० कोटी भारतीय हीच संघाची ताकद आहे. एका छोट्याशा गटापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून ओळखला जातो, जो राष्ट्र उभारणीच्या कार्यात अविरत कार्यरत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love