९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे—स्व.साने गुरुजींची (sane guruji) कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (akhil bhartiya marathi sahitya sammelan) अध्यक्षपदी आणि समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे (Dr. Ravindra Shobhane) यांची निवड झाली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, येत्या २,३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ असे तीन दिवस हा साहित्यिकांचा मेळा अमळनेर (amalner) येथे रंगणार आहे.

वर्धा येथील ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जेमतेम पाच महिने झाले असतानाच महामंडळाने पुढील संमेलनाची तयारी सुरू केली आहे. वर्धा येथे झालेल्या संमेलनातील असुविधांवर बरीच चर्चा झाल्याने महामंडळाने यावेळी सावध पवित्रा घेतला आहे. आयोजकांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी संमेलनाच्या तारखा व कार्यक्रम पत्रिका लवकरात लवकर निश्चित करण्याचे महामंडळाने ठरवले होते. त्याअंतर्गत रविवारी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या सर्व घटक आणि संलग्न संस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत रवींद्र शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावे या अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. यामध्ये डॉ. रवींद्र शोभणे यांचे नाव बहुमताने निवडण्यात आले.या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या नावासह संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रम पत्रिकेवर देखील चर्चा झाली. यावेळी महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते. संमेलनाच्या आयोजन करणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी डॉ. रवींद्र शोभणे यांची ९७ व्या अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षपदाची ही घोषणा केली.

अध्यक्ष पदासाठी घटक संस्था आणि संलग्न संस्थांकडून नावे आली होती पण, डॉ. शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असे त्यांनी सांगितले. अध्यक्ष तांबे म्हणाल्या, तीन दिवसाच्या संमेलनाचे कार्यक्रम जवळ पास नक्की करण्यात आले आहेत. त्यामध्ये उद्घाटन, समारोप सत्र याखेरीज बाल मेळावा, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, निमंत्रित कविंचे संमेलन, सांस्कृतीक कार्यक्रम, मुलाखत, परिसंवाद, परिचर्चा, अभिरुप न्यायालय, साहित्यिकांचे शताब्दी स्मरण, कवी कट्टा, गझल कट्टा, ग्रंथ प्रदर्शन आणि प्रकाशन कट्टा यांचा समावेश आहे. ग्रंथ प्रदर्शनासाठी २५० गाळे असणार आहेत. यावर्षी एक प्रकशक आणि जेष्ठ लेखक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.

डॉ. रवींद्र शोभणे यांचा परिचय

डॉ. रवींद्र शोभणे हे मूळचे नागपूरचे. नागपूच्या नरखेड तालुक्यातील खर्सोली या गावात त्यांचा जन्म झाला. खर्सोलीच्या शाळेत असताना विद्यार्थीदशेतच नाटक लिहून त्यांनी आपली लिखाणातली चुणूक दाखवली होती. तेथेच आदर्श विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. १९८९ मध्ये त्यांनी पीएचडीची पदवी मिळविली. श्री.ना. पेंडसे यांचे साहित्य हा शोभणे यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता.१९९१ मध्ये त्यांचा वर्तमान हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला

अनेकविध विषयांवर लिहिते राहून त्यांनी बहुआयामी लेखक अशी प्रतिमा निर्माण केली आहे. पडघम, पांढर, पांढरे हत्ती, शहामृग, वर्तमान, अदृष्टाच्या वाटा, ऐशा चौफेर टापूत, अश्वमेध, चंद्रोत्सव, चिरेबंद, दाही दिशा, कोंडी, महाभारत आणि मराठी कादंबरी, महाभारताचा मूल्यवेध, मराठी कविता : परंपरा आणि दर्शन, ओल्या पापाचे फूत्कार, रक्तध्रुव, संदर्भासह, सत्त्वशोधाच्या दिशा, सव्वीस दिवस, तद्भव, त्रिमिती, उत्तरायण, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

डॉ. शोभणे यांना त्यांच्या साहित्यसंपदेमुळे अनेक प्रकारचे सन्मान प्राप्त झाले आहेत. २००३मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. डॉ. शोभणे यांना साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती १९९४ साली प्राप्त झाली होती. मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून २००७ ते २०१२ यादरम्यान ते कार्यरत होते.

कथा, कादंबरी, नाट्य, कविता, समीक्षा, ललित, अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन करणार्‍या डॉ. रवींद्र शोभणे यांची वयाच्या विसाव्या वर्षी पहिली कविता, पहिला समीक्षात्मक लेख आणि पहिली कथा प्रकाशित झाली होती. सुरुवातीपासूनच वाचनाची प्रचंड आवड असलेले हे व्यक्तिमत्त्व सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, सांस्कृतिक, प्रांतीय स्थित्यंतरांचा जाणीवपूर्वक अभ्यास करीत, परिस्थितीचे डोळसपणे अवलोकन करीत लेखक म्हणून घडत गेले आणि १९८३ मध्ये वयाच्या चौतिसाव्या वर्षी त्यांची ‘प्रवाह’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. ‘सव्वीस दिवस’ सारख्या स्वानुभव कथनात्मक लघू कादंबरी लिहिणार्‍या रवींद्र शोभणेंच्या लेखणीतून ‘उत्तरायण’ ही महाभारतावर आधारित बृहद् कादंबरीही आकारास आली आहे.

कथालेखक म्हणूनही डॉ. रवींद्र शोभणे परिचित आहेत. १९९१ मध्ये त्यांचा ‘वर्तमान’ हा पहिला कथासंग्रह मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केला. त्यानंतर १९९४ ते २००८ या काळात त्यांचे ‘दाही दिशा’, ‘शहामृग’, ‘तद्भव’, ‘अदृष्टाच्या वाटा’ असे पाच कथासंग्रह प्रकाशित झाले.

‘कादंबरीकार श्री.ना.पेंडसे’, ‘सत्त्वशोधाच्या दिशा’, ‘संदर्भासह’ अशी त्यांची समीक्षात्मक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. ‘कथांजली’ आणि ‘मराठी कविता परंपरा आणि दर्शन’ या दोन पुस्तकांचे संपादन डॉ. शोभणे यांनी केलेले आहे. ‘ऐशा चौफेर टापूत’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह २००७ मध्ये प्रकाशित झाला.

१९९२मध्ये प्रकाशित झालेल्या ‘कोंडी’ या कादंबरीने त्यांना खर्‍या अर्थाने कादंबरीकार म्हणून लौकिक मिळवून दिला. वैदर्भीय प्रादेशिकतेची वैशिष्ट्ये, वैदर्भीय बोली भाषा, तेथील व्यक्तिमत्त्वे, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचा सांस्कृतिक वारसा, त्यांचे राजकीय डावपेच या सर्वांचे वास्तव चित्रण करीत विलक्षण ताकदीने शोभणे यांनी ‘कोंडी’चे कथानक उभे केलेले आहे. त्यांच्या या कादंबरीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.ल.ठोकळ पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार असे काही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या मानवी वास्तवाचा नवस्पर्श लाभलेल्या महाभारतावरील ‘उत्तरायण’ या बृहद् कादंबरीला वि.सा.संघाचा पु.ल.देशपांडे पुरस्कार, घनश्यामदास सराफ पुरस्कार, महाराष्ट्र फाउण्डेशनचा पुरस्कार हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, तर त्यांच्या ‘पडघम’ या सामाजिक व राजकीय कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा ह.ना.आपटे पुरस्कार प्राप्त झाला आहे.

१९७५ ते १९८४ या कालखंडातील महाराष्ट्रीय, तसेच भारतीय समाजजीवनातील र्‍हासपर्वाचे, विविध राजकीय पक्ष संघटनांचे, आणीबाणीनंतरच्या राजकीय जीवनाचे असे बहुकेंद्री पडसाद ‘पडघम’ या महाकादंबरीमध्ये उमटलेले आहेत. ‘रक्तधृव’ या आगळ्या आशयाच्या व विचार प्रवृत्त करणार्‍या कादंबरीलाही तल्हार स्मृती पुरस्कार व लोकमत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या चिरेबंद’ या देशमुख आणि कंपनी, पुणे यांनी १९९५मध्ये प्रकाशित केलेल्या कादंबरीला ग्रंथोत्तेजक पुरस्कार, तसेच रणजीत देसाई पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

डॉ. रवींद्र शोभणे यांना त्यांच्या विविधांगी साहित्यसंपदेची दखल घेणारे अनेक प्रकारचे सन्मान प्राप्त झाले आहेत. २००३मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या युवा साहित्यिकाने भूषविले होते

वास्तवाचे भान ठेवत सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्वच स्थित्यंतरांची वैशिष्ट्ये डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपल्या कथा-कादंबरी या साहित्यप्रकारांमधून जपली आहेत. सामाजिक परिवर्तनांचे ग्रामीण व नागरी समाजजीवनावर होणारे चांगले व वाईट परिणाम टिपत कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत आकारास आलेल्या त्यांच्या साहित्यनिर्मितीने आपले वेगळेपण जपले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *