कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान : शेवटच्या दिवशीही आरोप -प्रत्यारोप : धंगेकरांची उमेदवारी रद्द करावी – भाजपने का केली मागणी?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–कसबा (kasba) आणि चिंचवड (chinchvad) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (२६ फेब्रुवारी) सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठापणाला लागली असून, किती टक्के मतदान होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

कसब्यामध्ये भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक(mukta tilak) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे, तर चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप(lakshman jagtap) यांच्या निधनाने पोटनिवडणूक होत आहे. कसब्यामध्ये भाजपने हेमंत रासने (hemant rasane) यांना, तर महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर(ravindra dhangekar) यांना उमेदवारी दिली आहे. चिंचवडमध्ये भाजपने अश्विनी जगताप(ashvini jagtap) यांना तर, महाविकास आघाडीने नाना काटे(nana kate) यांना निवडणूकीमध्ये उतरविले आहे. बंडखोर राहुल कलाटे(rahul kalate) हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

कसबा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गेले ३० वर्षे कसब्यावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. पण, यावेळेस काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. धंगेकर मागील २५  वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळय़ा प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत पहायला मिळणार आहे. तर, चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

शेवटचा दिवसही आरोप प्रत्यारोपांनी गाजला 

 मतदानाचा दिवस आला आणि प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या असल्या तरी शनिवारचा दिवस आरोप- प्रत्यारोपांनी गाजला. कसबा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी सकाळी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण करीत प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपाने पोलिसांना हाताशी घेऊन कसब्यात पैसे वाटप केले, असा आरोप केला आणि कारवाईची मागणी केली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यानं उपोषण मागे घेतले. दरम्यान, रवींद्र धंगेकरांनी उपोषण करत निवडणूक आयोगाच्या अचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

कसब्याची प्रचाराची मुदत संपली असताना भाजपाच्या नेत्यांनी मतदारसंघात रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करत होते. भाजपाचे वरिष्ठ नेते, पालकमंत्र्यासह अनेक मंत्री पोलिसांच्या उपस्थित प्रचार व पैस्यांचे वाटप केले. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या  होत आहे. हा सगळा प्रकार निवडणूक आयोग, पोलिसांसमोर होत आहे. मात्र तरीही त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसदेखील दिली नाही. पोलिसांकडून माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटीदेखील होत आहे. गुन्हेगार आणि पोलिसही त्यांच्यात सामील झाले आहेत, अशा संतप्त भावना व्यक्त करीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी सपत्नीक  कसबा गणपती मंदिरासमोर धरणे धरले. रविंद्र धंगेकर यांनी केलेल्या मागणीची चौकशी करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गील यांनी आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी दुपारी आपले धरणे मागे घेतले.

कसबा पोटनिवणूकीचा २४ फेबुवारी हा शेवटचा दिवस होता. निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना मतदारसंघातील  प्रत्येक कानाकोपर्‍यातून मतदारांचा त्यांना पाठींबा आहे. त्यामुळे भाजपाला आपला पराभव दिसून येत असल्याने प्रचाराची वेळ निघून गेल्यानंतर भाजप नेत्यांनी पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला

गेल्या ३०  वर्षापासून माझ्या कार्यकर्त्यांना संभाळत असून कार्यकर्ते माझं घर आहे. त्यांना जर कोणी त्रास देत असतील तर ते मी सहन करणार नाही. मला चौकात गोळी मारा पण माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, अशा संतप्त भावना यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, मी नियम पाळतो आहे, पण समोरच्या पक्षाकडून नियम डावलून पैसे वाटले जात आहे. मी लोकशाहीसाठी आंदोलन करतो आहे असेही यावेळी ते म्हणाले.

प्रचार संपला तरीदेखील भाजपा नेते मंडळी, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घरोघरी प्रचार केला जात होता. तसेच भाजपाचे पदाधिकारी कसबा मतदार संघात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करीत आहे. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना  मतदार संघ सोडून बाहेर जाण्याचे सांगत पोलिस माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे. गुन्हेगार आणि पोलिसही त्यांच्यात सामील झाले आहेत, असा आरोप यावेळी रविंद्र धंगेकर यांनी केला. पोलिस राजकीय एजंट म्हणून पैसे वाटप करतात, हे अनेकदा पुराव्यासहीत उघड केले आहे. पोलिसासमवेत ते भाजपा कार्यकर्त्यांचा बिनधास्तपणे वावर होत असल्याने भाजपाकडून सर्व यंत्रणाचा वापर होत असून हा लोकशाहीचा खून होत असल्याची  भावनादेखील यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केली.

रवींद्र धंगेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी अचारसंहितेचा भंग केला आहे. कुठलेही पुरावे नसताना त्यांनी आमच्यावर आरोप केले. पोलिसांवरही आरोप केले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या अचारसंहितेचा भंग केल्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करत आहोत,  त्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचा भंग केला आहे, असे भाजपचे संघटन सचिव राजेश पांडे यांनी सांगितले.

भाजपच्या शिष्टमंडळाने रवींद्र धंगेकर यांच्याविषयी तक्रार दाखल केली. “आम्हाला बोगस मदतानाची शक्यता वाटते. वोटिंग कार्ड बोगस आहेत. त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान होऊद्या, अशी आम्ही मागणी केलीय”, अशी प्रतिक्रिया या शिष्टमंडळाने दिली.

“कसबा निवडणुकीत बोगस मतदार आणून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या उमेदवारामार्फत सुरु आहे. आम्ही हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत. आम्ही पोलिसांना असे केंद्र सांगितले आहेत जिथे बोगस मतदानाची तयारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेली आहे. त्याठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त लावला पाहिजे. तिथे कुठल्याही पद्धतीत बोगस मतदान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे”, असं भाजप नेते जगदीश मुळीक म्हणाले.

महाविकास आघाडीने निवडणुकीमध्ये जातीयवाद आणण्याचा प्रयत्न केला. विकासाच्या मुद्द्यावर लढली जाणारी निवडणूक त्यांनी जातीय आणि धर्माच्या ध्रुवीकरणाकडे नेली. त्यांनी मुस्लिमांना असं आवाहन केलंय की, मतदानासाठी मेलेल्या लोकांना आणा, दुबईचे आणा आणि आखातीचेही आणा.  या विधानामुळे कसब्यातील हिंदू जनतेच्या भावनेला ठेच पोहोचवली आहे. यामुळे या दोन्ही विषयाची तक्रार आम्ही आज निवडणूक आयोगाकडे करणार आहोत,” अशी माहिती राजेश पांडे यांनी दिली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *