यह तो बस अंगडाई है, आगे तो लढाई है – चंद्रकांत पाटील


मुंबई – “यह तो बस अंगडाई है, आगे तो लढाई है”, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. शरद पवार यांनी जातीयतेचे राजकारण बंद करावे असा टोलाही त्यांनी लगावला.

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केवळ पोलिसांकडून लाच घेणे, भ्रष्टाचार करणे असे प्रकार केले आहेत.

1993 साली जो बॉम्बस्फोट झाला त्याच्या येथील जनतेच्या जखमा ताज्या आहेत. ज्या लोकांनी बॉम्बस्फोट घडवून आणले त्यांच्याबरोबर जर कोणी व्यवहार करत असेल तर देशविरोधी गतिविधि होण्यात तुमचाही हात आहे. म्हणूनच मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा आम्ही मागत आहोत आणि तो घेतल्याशिवाय भाजपला शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला

अधिक वाचा  चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन- जयंत पाटील

या सरकारमधील एका मंत्र्याला दोन बायका आहेत.  निवडणूक आयोगाला लोकप्रतिनिधी म्हणून माहिती देताना ही  माहिती लपवली जाते आणि ते जाहीरपणे पुन्हा सांगतात माझ्यापासून दोन मुले झाली आहेत.  हे कसे होऊ शकते? अशी टीका त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली.

वर्षाला शंभर कोटीच टारगेट जर पोलिसांना त्या खात्याचा मंत्रीच देत असेल तर भ्रष्टाचार किती टोकाला गेला आहे हे यावरून सिद्ध होते. तर दुसरीकडे सरकारमधील एक मंत्री 100 कोटीचं रिसॉर्ट बांधतात आणि दुसरीकडे एक मंत्री देशविरोधी कारवाया करणाऱ्या बरोबर व्यवहार करतात त्यामुळे या सर्वांपासून राष्ट्राला खरा धोका आहे असेही ते म्हणाले.

1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटाची माहिती घेऊन तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी चौकशी समिती नेमली होती आणि त्या समितीने अहवाल  सरकारकडे सादर केला होता. हा  अहवाल जर घोषित केला गेला तर अनेक नेत्यांना तोंड दाखवणे अवघड होईल असेही त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  काहींना कळतच नाही की समजूतदारपणा काय आणि असमजुतदारपणा काय- अजित दादांचा चंद्रकांत पाटलांना टोला

आघाडी सरकारमधील बहुतांश मंत्री भ्रष्टाचारामुळे तुरुंगात जाणार असल्याने हे सरकार टिकणार नाही असे सांगत पुराव्याच्या आधारे आम्ही सर्व घोटाळे बाहेर काढू आणि किरीट सोमय्या यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असा विश्वास त्यांनी किरीट सोमय्या यांना दिला.  शरद पवार यांनी राज्यातील जातीयतेचे राजकारण बंद करावे,“यह तो बस अंगडाई है ,आगे तो लढाई है”, असे म्हणत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love