जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे-डॉ. राम चरण

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -“जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे. त्यामुळे या दिशेने मोठ्या प्रमाणात कार्य करावे. यात शिक्षण संस्थांची भूमिका ही महत्वाची असून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निर्मितीवर अधिक भर दयावा. तुमच्या विचारात एवढी शक्ती हवी, की त्यामुळे लोकांची विचारसरणी बदलेल.” असे प्रतिपादन युएसए येथील जागतिक किर्तीचे व्यावसायिक सल्लागार, लेखक आणि विचारवंत डॉ. राम चरण यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्यातर्फे डॉ. राम चरण यांना ‘भारत अस्मिता विशेष पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. त्या प्रसंगी त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

यावेळी हार्वर्ड  बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत दातार यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार , लडाख येथील बीजेपीचे तरूण खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांना ः‘भारत अस्मिता जन प्रतिनिधि श्रेष्ठ पुरस्कार’, बॉयोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा पद्मभूषण डॉ. किरण मुजुमदार शॉ यांना ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे आणि सुप्रसिद्ध फिल्म निर्मात्या व लेखिका पद्मभूषण श्रीमती सई परांजपे यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व प्रत्येकी सव्वा लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी विख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड हे उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटीचेे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व कुलगुरू डॉ.एन.टी.राव हे उपस्थित होते.

डॉ. रामचरण म्हणाले,“देशाचे नेतृत्व करतांना आज हॉवर्ड बिजनेस स्कूल मध्ये २२ सदस्य हे भारतीय आहेत. त्यामध्ये डॉ. दातार हे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असून ते जागतिक दर्जाचे नेतृत्व करून ग्लोबल लिडर्सची निर्मिती करीत आहेत. कोणत्याही क्षेत्रात असो, समर्पण भावनेने केलेल्या कार्याला यश मिळतेच. जागतिक दर्जाचे नेतृत्व करणारे गुगलचे सुंदर पिचाई हे भारतीय आहेत. प्रगती हे जीवनाचे सूत्र असल्याने आर्थिक उन्नतीसाठी जोमाने कार्य करावे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संपूर्ण जगात डायरेक्ट इन्वेस्टमेंट सुरू झाल्याने प्रगतीचे दरवाजे उघडल्या गेले आहेत.”

डॉ.श्रीकांत दातार म्हणाले,“ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शिक्षणावर केलेले भाष्य सदैव मला प्रेरित करत असतात. त्यांनी चरित्र आणि नैतिकतेवर अधिक भर दिला आहे. कोविडच्या काळात मॅनेजमेंट शिक्षणाच्या महत्वपूर्ण वाढ झाली आहे. तसेच, या काळात शिक्षण पद्धतीत बदल झाल्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे आंत्रप्रेन्यूअरशिपसाठी कारणीभूत ठरले आहे. मॅनेजमेट शिक्षण हे नोईंग स्कील आणि डुईंग  स्कील शिकवते. त्याची प्रचिती जीवनात पावलोपावली येते.”

जामयांग त्सेरिंग नामग्याल म्हणाले,“ जनतेचा प्रतिनिधी असल्याने आपल्यात सहनशीलता हवी. देशातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी कार्य करावे. मी लद्दाख येथील नागरिकांच्या शक्य तितक्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला. आज जनतेचा प्रतिनिधी या नात्याने देशालाही समोर घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे. लोकांची जी आकांक्षा आहे तीला पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे.”

डॉ. किरण मुजुमदार शॉ म्हणाल्या, “ आजच्या काळात नवनिर्मिती शिक्षणाला महत्व आहे. बायोटेक्नॉलॉजीमुळे भारत हा जगाच्या नकाशावर पोहचला आहे. उद्देश आणि लक्ष या दोन गोष्टींच्या जोरावरच आपण यश मिळवू शकतो. संशोधन आणि नवनिर्मितीवर अधिक भर देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जावे. सध्याच्या युगात विश्वासार्हता हे सर्वात मोठे आव्हान आहे.”

सई परांजपे म्हणाल्या,“  चित्रपटांच्या माध्यमातून समाजातील बोथट समस्यांवर विचार मांडून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज विज्ञान, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर, संवाद, अ‍ॅस्ट्रोलॉजीसारखे शिक्षणा बरोबरच संगीताचे शिक्षण देऊन विद्यार्थी घडवावेत. तसेच मनोरंजन हे समाजासाठी आवश्यक असल्याने या पुढे ही या क्षेत्रासमोर मोठे आव्हान असणारच आहे.”

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. शिक्षण क्षेत्रातील एक मोठ्या व्यक्तीच्या जन्म दिवसावर दिला जाणारा या पुरस्काराचा मी १७ वर्षापासून सदस्य आहे. आम्हाला आनंद होतो की या वर्षी दोन महिलांना या पुरस्काराने सम्मानीत करण्यात येत आहे. तसेच डॉ.श्रीकांत दातार व डॉ. रामचरण यांनी निवड ही अभिमानास्पद आहे.”

डॉ. विजय भटकर म्हणाले,“ विज्ञान आणि अध्यात्माचा संगम साधणारे डॉ. विश्वनाथ कराड यांचा वाढदिवस हा खूप महत्वाचा आहे. या दिवशी दिला जाणारा भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार हे देशातील विशेष कार्यरत व्यक्तीचा सत्कार असतो. डॉ. कराड यांनी समाजातील सर्वच क्षेत्रात कार्य केले आहे. ५ ग म्हणजे गणेश, गंगा, गायत्री, गोमाता, आणि भगवत गीता हे देशासाठी महत्वाचे आहे. शिक्षणातून सर्वांगीण विकास होतो असे ही ते म्हणाले.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ जीवनाचा उद्देश काय आहे. आपण कसे जगावे आणि जगू नये याचे ज्ञान अध्यात्म देते. त्यामुळे हा प्रवास संत ज्ञानेश्वर ते अल्बर्ट आइन्स्टाईन पर्यंतचा आहे. प्रत्येकाला आपले कर्तव्य विसरता कामा नये. येणार्‍या काळात विश्व शांतीसाठी ग्लोबल एज्युकेशन मॅनेजिंग काउंसिलची आवश्यकता आहे.”

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ भारताने नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे त्यामध्ये लिबरल आर्ट सारख्या शिक्षणावरही भर दिला आहे. पण आम्ही यापूर्वीच ही शाखा सुरू केली आहे. येणार्‍या काळात शिक्षणाची पद्धत व त्यामागच्या यंत्रणेत मोठे बदल होत आहे. अशावेळेस नव्या पद्धतीचा स्विकार करावा. आता प्रत्येक क्षेत्रात संशोधनावर अधिक भर देणे गरजेचे असून भविष्यासाठी सर्वांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे.”

या नंतर पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी व्हिडियोच्या माध्यमातून संगीत हे मानव जीवनात सर्वात महत्वाचे असून त्यामुळे आंतरिक शांती लाभते. संगीत हे भारताची आत्मा आहे. असा संदेश दिला.

डॉ.एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केले.

प्रा. गौतम बापट यांनी सूत्र संचालन केले. प्रा.डॉ. अनुराधा पराशर यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *