पुणे (प्रतिनिधी) – लष्करी कार्यवाहीत झालेले नुकसान महत्त्वाचे नसते, तर अंतिम परिणाम महत्त्वाचे असतात असे स्पष्ट करतानाच व्यावसायिक लष्करी दले नुकसानीने घाबरत नाहीत असे भारताचे संरक्षण दल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान (Chief of Defence Staff General Anil Chauhan) यांनी सांगितले. पाकिस्तानची मनिषा भारताला ४८ तासात गुडघे टेकायला लावण्याची होती. मात्र, पाकिस्तानला अपेक्षित असलेले ४८ तासांचे ऑपरेशन भारताने केवळ ८ तासातच उद्ध्वस्त केले असेही त्यांनी नमूद केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) झालेल्या ‘फ्यूचर वॉर अँड वॉरफेअर‘ (Future War and Warfare) या विषयावरील व्याख्यानात, जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर‘ (Operation Sindoor) आणि भारत-पाकिस्तान संबंधांवर महत्त्वाचे विधान केले आहे.
जनरल चौहान यांनी लष्करी कारवाईतील नुकसानीपेक्षा अंतिम परिणाम महत्त्वाचा असतो यावर भर दिला. ते म्हणाले की, व्यावसायिक लष्करी दले नुकसानीने घाबरत नाहीत. त्यांनी क्रिकेट कसोटी सामन्याचे उदाहरण देत हे स्पष्ट केले: “समजा तुम्ही क्रिकेट कसोटी सामना खेळायला गेलात आणि तो डाव राखून जिंकलात, तर किती विकेट पडल्या किंवा किती चेंडू शिल्लक होते, हे प्रश्न महत्त्वाचे नसतात”. याचा अर्थ स्पष्ट आहे की, सैन्यासाठी अंतिम विजय आणि उद्दिष्टपूर्ती हीच खरी यशोगाथा असते.
जनरल चौहान पाकिस्तानच्या कुटिल हेतूंवर प्रकाश टाकताना म्हणाले की, ९ मे रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानची मनिषा भारताला ४८ तासात गुडघे टेकायला लावण्याची होती. पाकिस्तानने अनेक हल्ले केले आणि या संघर्षाची तीव्रता वाढवली तर भारताने केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले होते. मात्र, पाकिस्तानला अपेक्षित असलेले ४८ तासांचे ऑपरेशन भारताने केवळ ८ तासातच उद्ध्वस्त केले. यानंतर, पाकिस्तानने थेट भारताला फोन करून चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. भारताने ७ मे रोजी सर्जिकल स्ट्राइक (Surgical Strike) नंतरच पाकिस्तानला याची माहिती दिली होती. जर पाकिस्तानने भारतावर, विशेषतः लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला केला, तर भारत त्यांना अधिक जोरदार प्रत्युत्तर देईल, असेही भारताने स्पष्टपणे सांगितले होते असे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले.
दहशतवाद आणि त्याची क्रूरता
या संघर्षाची सुरुवात पहलगाममधील अतिशय क्रूर दहशतवादी हल्ल्यातून (Brutal Terrorist Attack in Pahalgam) झाली होती, असे जनरल चौहान यांनी नमूद केले. दहशतवाद हा युद्धाचा योग्य मार्ग मानला जाऊ शकतो का, असा प्रश्न जनरल चौहान यांनी उपस्थित केला, कारण दहशतवादाला कोणताही निश्चित नियम नसतो. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबवणे ही ‘ऑपरेशन सिंदूर’ मागील मुख्य विचार होता, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे उद्दीष्ट भारताला ‘हजारो जखमा देण्याचे’ आहे, म्हणजे ते भारताला सतत नुकसान पोहोचवू इच्छितात असे सांगत जनरल चौहान यांनी १९६५ मध्ये झुल्फिकार अली भुत्तो (Zulfiqar Ali Bhutto) यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) भारतावर ‘हजार वर्षांचे युद्ध‘ (Hazar Saal Ki Jang – Thousand Years War) घोषित केल्याचाही उल्लेख केला, याचा अर्थ ते भारतासोबत खूप दीर्घकाळापर्यंत शत्रुत्व ठेवू इच्छित होते, विशेष म्हणजे, पहलगाम हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वीच पाक लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर (Pak Army Chief General Asim Munir) यांनी भारत आणि हिंदूंविरुद्ध ‘विष ओकले’ होते, असेही त्यांनी सांगितले.
सीडीएस अनिल चौहान यांनी नमूद केले की, पाकिस्तानची ड्रोन क्षमता (Drone Capability) भारताच्या तुलनेत खूप कमकुवत आहे. तसेच, भारताकडे मजबूत ‘काउंटर ड्रोन सिस्टीम‘ (Counter Drone System) असल्याचे त्यांना माहीत आहे. ही बाब भारताच्या आधुनिक लष्करी सज्जतेचे द्योतक आहे.
जनरल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहिले असे ‘संपर्क रहित युद्ध‘ (Contactless War) होते, जे भारताने लढले, असे वर्णन केले. हे युद्ध कायनेटिक (Kinetic) आणि नॉन-कायनेटिक ऑपरेशन्सचे (Non-Kinetic Operations) मिश्रण होते असे नमूद केले. युद्धाच्या मैदानावर क्षमतेची खरी चाचणी होते. जोखीम नेहमीच असते, परंतु जोपर्यंत तुम्ही जोखीम घेत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. भारत दहशतवादाच्या आणि अणू हल्ल्याच्या धमक्यांच्या छायेखाली राहणार नाही असे ठामपणे सांगून ते म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये युद्ध आणि राजकारण दोन्ही समांतरपणे सुरू होते. भारताने दहशतवादाविरोधात लष्करी कारवाईची नवीन रेषा आखली आहे, असेही ते म्हणाले.