पुणे-राज्यात सत्तेत येण्याकरिता भाजपला कोणत्याही पक्षाची कुबडी नको आहे. यापुढील काळात पूर्ण स्वबळावर भाजप निवडणुक लढवेल आणि एकट्याच्या ताकदीवर राज्यात सत्ता आणेल असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केला.
भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त ते पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, केंद्रात सुरुवातीला सत्ता स्थापनाकरिता 272 खासदार निवडून येणे अपेक्षित असते आणि कमळाच्या चिन्हावर 303 खासदार निवडून आले आणि पुन्हा 400 जण निवडून येतील. अनेक राज्यांत स्वतःच्या ताकदीवर भाजपचे उमेदवार निवडून येत आहेत. फक्त महाराष्ट्रात आम्हाला अडचण होती. ती सुद्धा येत्या निवडणुकीत संपवणार असे पाटील म्हणाले. भारतीय जनता पक्ष इथून पुढे महाराष्ट्रातील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल. आता कुठलीही कुबडी नको. भारतीय जनता पक्ष आता स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणेल, असे पाटील यावेळी म्हणाले.
लॉकडाऊनमुळे ज्या वर्गाला आर्थिक झळ सहन करावी लागली त्यांना आर्थिक मदत करा आणि पुन्हा लॉकडाऊन करा अशी माझी आणि विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी होती. मिनी लॉकडाऊनचे नावाखाली सरकारने पूर्ण लॉकडाऊन केलेले आहे. घरकाम, फेरीवाले, रिक्षावाले, मजूर हे कोरोनाने मरण्यापेक्षा भूकेने मरु या विचाराने रस्त्यावर उतरत आहे. कोविडच्या संकटात सर्वसामान्य लोकांसोबत राहून त्यांना या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. रक्तदान शिबीर, ऑक्सिजन बेड उपलब्धता, कोविड केअर सेंटर उभारणी, स्वॅब तपासणी याबाबत कार्यकर्ते मदतकार्य करत आहे. राज्यात 97 हजार बूथवर प्रत्येकी 30 जणांची समिती यादृष्टीने आम्ही काम करत असून सध्या 82 हजार बूथपर्यंत काम पूर्ण झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले.