Ajit Pawar died in a plane crash : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे भिषण विमान अपघातात निधन झाले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीमध्ये आयोजित केलेल्या चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी ते मुंबईहून पहाटे विमानाने निघाले होते. मात्र, बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वीच त्यांच्या विमानाला धावपट्टीवर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. “दादा” या नावाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय असलेले अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा स्तंभ होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक धडाडीचा आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता गमावला आहे. अजित दादांच्या आकस्मित जाण्याने केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असल्याच्या भावना अगदी सर्वसामान्य माणसापासून राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या.
या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
अजित पवार हे ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी ‘लिअर जेट ४५’ (VT-SSK) या खाजगी विमानान जात होते. फ्लाईट रडारच्या माहितीनुसार, या विमानाने सकाळी ८.१० वाजता मुंबईहून उड्डाण केले होते. मात्र सकाळी ८.४५ च्या सुमारास विमानाचा रडारशी संपर्क तुटला आणि सकाळी ८:४८ वाजता बारामती विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक ११ च्या अगदी सुरुवातीला कोसळले. विमान धावपट्टीवर आदळताच त्याचे दोन तुकडे झाले आणि त्याला भीषण आग लागली. बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी सांगितले की, विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या एका बाजूला जाऊन आदळले आणि मोठा स्फोट झाला. हे विमान मुंबईहून भाड्याने घेण्यात आले होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघात होण्यापूर्वी हे विमान हवेत काहीसे अस्थिर दिसत होते. एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान बारामती विमानतळाच्या परिसरात घिरट्या घालत होते. धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच हे विमान जमिनीवर जोरदार आदळले आणि मोठा स्फोट झाला. हा आवाज इतका प्रचंड होता की तो जवळच्या वस्त्यांमधील घरांपर्यंत ऐकू आला. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी एका बाजूला झुकले होते आणि स्फोटानंतर विमानाचे अनेक तुकडे हवेत उडून आजूबाजूच्या घरांजवळ पडले.
दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टीपासून साधारण १०० फूट उंचीवर असतानाच नियंत्रणाबाहेर गेल्यासारखे वाटत होते. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर काही क्षणांतच लागोपाठ चार ते पाच मोठे स्फोट झाले, ज्यामुळे विमानाला भीषण आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आणि सतत होत असलेल्या स्फोटांमुळे कोणालाही मदतीसाठी विमानाजवळ जाणे शक्य झाले नाही.
अशी पटली मृतदेहाची ओळख
अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातात असलेला घड्याळ, त्यांनी घातलेला गॅगल आणि जॅकेटमुळे ओळखण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर सर्व मृतदेह झाकण्यासाठी स्थानिकांनी ब्लँकेट आणि घरात असलेल्या कपडे पोलीस आणि मदतकार्य करणाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले.
कार्यकर्ते आणि नागरिक धाय मोकलून रडले
अपघाताची बातमी समजताच बारामतीकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. अनेक कार्यकर्ते आणि नागरिक धाय मोकलून रडत होते, तर काही जण एकमेकांच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडताना दिसले. संकटाच्या काळात एखाद्या मोठ्या भावासारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आपला थोरला भाऊ आज आपल्यात नाही, ही भावना बारामतीकरांना अस्वस्थ करून सोडणारी ठरली.
सन १९९१ पासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत या परिसराचा कायापालट करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले होते. केवळ बारामतीच नव्हे, तर पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावरही त्यांची मजबूत पकड होती.
अजित पवार यांची ओळख एक ‘स्पष्टवक्ता’ आणि ‘कामाचा माणूस’ अशी होती. सुरुवातीच्या काळात त्यांच्या परखड बोलण्यावर टीका झाली असली तरी, त्यांच्या कामाची पद्धत पाहून बारामतीकरांनी त्यांचा हा स्वभाव मनापासून स्वीकारला होता. चुकीच्या गोष्टींना कधीही समर्थन न देणारे आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून समाजकारण करणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या अचानक जाण्याने गेल्या तीन दशकांचा खंबीर राजकीय प्रवास थांबला असून, महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अजितदादांना मुख्यमंत्री होताना पहायचे होते : चाहत्यांच्या भावना
अजित दादांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बारामती तालुक्यातील दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. सोमेश्वर, पणदरे, सुपा, शिर्सुफळ आदी गावांमधून बारामतीकडे जाण्यासाठी नागरिकांची रीघ लागली होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी अजित दादांवर प्रेम करणाऱ्या बारामतीकरांनी अजितदादांच्या निधनाच्या विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. नक्की काय झाले, याची स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करण्यासाठी गावागावातून हातातील कामे सोडून बारामतीमध्ये लोक जमले होते. तर, परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत होती.
‘दादा इतक्यात जाऊच शकत नाही, अजून बरेच काम बाकी आहे. अजितदादांना मुख्यमंत्री होताना पहायचे होते. नियतीने असा अचानक घाला घातला,’ अशी भावना एका बारामतीकाराने व्यक्त केली.
अपघाताचा थरार आणि तांत्रिक कारणे
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, ते ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या दिल्लीस्थित कंपनीचे ‘लिअरजेट ४५’ (VT-SSK) हे छोटे खाजगी चार्टर विमान होते. कंपनीचे कॅप्टन व्ही.के. सिंह यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्या भागात असलेले खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला नसावा, ज्यामुळे विमानाचे क्रॅश लँडिंग झाले आणि भीषण स्फोट होऊन आग लागली.
विमान कंपनी आणि मॉडेलचा वादग्रस्त इतिहास
या दुर्घटनेनंतर ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनी आणि ‘लिअरजेट ४५’ या विमानांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२३ मध्ये याच कंपनीच्या एका विमानाचा मुंबई विमानतळावर धावपट्टीवर घसरून अपघात झाला होता. त्यावेळी सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती, मात्र दोन वर्षांच्या अंतरात एकाच कंपनीच्या दोन विमानांचा महाराष्ट्रात अपघात होणे ही चिंतेची बाब ठरली आहे. याशिवाय, लिअरजेट ४५ या मॉडेलचा जागतिक इतिहासही अशुभ राहिला आहे. मेक्सिकोमध्ये २००८ आणि २०२१ मध्ये अशाच प्रकारच्या विमानांचे भीषण अपघात झाले होते, ज्यात तिथल्या गृहमंत्र्यांसह अनेक जणांना प्राण गमवावे लागले होते, तर २००३ मध्ये इटलीमध्येही या मॉडेलचा अपघात झाला होता.
चौकशीसाठी समिती
या भीषण अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. डीजीसीएचे प्रमुख फैज अहमद किडवाई यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली असून अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, बारामती विमानतळ जे पूर्वी एका खाजगी ऑपरेटरकडे होते, ते अलीकडेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले होते.
बालपण व शिक्षण
अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली (प्रवरा) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.
कारकीर्द सुरुवात
अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.
राजकीय प्रवास
अजित पवार हे भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ज्येष्ठ नेते आणि त्यांचे काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. १९९१ पासून त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व केले आणि प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.
त्यांचे राजकीय सामर्थ्य प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात रुजलेले होते. तब्बल १६ वर्षे त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने आणि दूध संघांवर त्यांची मोठी पकड होती. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी जलसंपदा, ऊर्जा आणि ग्रामविकास यांसारखी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली होती. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांसारख्या विविध मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
अजित पवार हे त्यांच्या धाडसी आणि कधीकधी वादग्रस्त निर्णयांसाठी नेहमीच चर्चेत राहिले. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का मानला जातो, जरी तो प्रयोग केवळ ८० तास टिकला होता. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांनी शरद पवारांच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिले होते. निवडणूक आयोगाने देखील त्यांच्या गटालाच ‘खरी’ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे नाव व चिन्ह त्यांना बहाल केले.
मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अखेरपर्यंत अधुरेच
विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा मान अजित पवारांना मिळाला, मात्र राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अखेरपर्यंत अधुरेच राहिले. १० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर २०१२ ते २०१४ दरम्यान त्यांनी दुसऱ्यांदा हे पद भूषवले. नोव्हेंबर २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीवेळी ते तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले, तर त्यानंतर लगेचच महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी चौथ्यांदा या पदाची शपथ घेतली. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ते पाचव्यांदा आणि डिसेंबर २०२४ मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यावर सहाव्यांदा उपमुख्यमंत्री बनले.
अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी तीन वेळा अतिशय जवळून हुकली होती. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पहिली संधी हुकली. त्यानंतर २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीनंतर अवघ्या ८० तासांत सरकार कोसळल्याने त्यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. पुढे २०२२ मधील सत्तांतरानंतर आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरही ते मुख्यमंत्री होतील अशा चर्चा होत्या, परंतु एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिल्याने तिसऱ्यांदाही त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
प्रशासनावार मजबूत पकड असलेला नेता
अजित दादा यांच्या प्रशासकीय कामाचा प्रचंड उरक आणि “नो-nonsense” कार्यपद्धतीमुळे सनदी अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर होता. कोणत्याही फाईलवर त्वरित निर्णय घेणे आणि विकासकामांना गती देणे ही त्यांची ओळख होती.
अजितदादा हे त्यांच्या शिस्तप्रिय, वक्तशीर आणि विकासकामांना गती देणाऱ्या प्रशासकीय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध होते. ‘पहाटे कामाला लागणारा नेता’ अशी ओळख असलेले दादा, जलसंपदा व ऊर्जा क्षेत्रातील निर्णयांसाठी, तसेच अर्थमंत्री म्हणून बारकाईने आर्थिक नियोजनासाठी ओळखले जात. ते स्पष्टवक्ते, कामात तत्परता मानणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड ठेवणारे लोकनेते होते.
अजितदादांच्या कार्यपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये:
अजित दादा यांच्या कार्यपद्धतीत विकास, शिस्त आणि काम पूर्ण करण्याच्या ध्येयाला सर्वोच्च प्राधान्य होते.
वक्तशीरपणा आणि शिस्त: सकाळी लवकर उठून कामाला लागणे, सभांना वेळेवर उपस्थित राहणे आणि सरकारी कामांमध्ये दिरंगाई खपवून न घेणे, ही त्यांची मुख्य ओळख होती.
वेगवान प्रशासन: फाइल कामांचा निपटारा तातडीने व्हावा, यावर त्यांचा भर असतो. प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून काम काढून घेण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.
विकासाची दृष्टी: पायाभूत सुविधा, सिंचन प्रकल्प, आणि शहर विकासावर त्यांचा विशेष भर असतो. बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
स्पष्टवक्तेपणा: कामाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडणे, काम होणार असेल तर ‘हो’ आणि नसेल तर स्पष्ट ‘नाही’ सांगण्याची त्यांची पद्धत होती.
जनता दरबार व थेट संवाद: सत्तेत असताना किंवा नसतानाही ते जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी ‘जनता दरबार’ भरवत, तसेच कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत.
आर्थिक शिस्त: राज्याचे अर्थमंत्री म्हणून बजेट तयार करताना ते काटकसरीवर आणि विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यावर भर देत.
भूषवलेली पदे
विश्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती
संचालकः छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा, पुणे
संचालक : रयत शिक्षण संस्था, सातारा
अध्यक्ष : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ. (सप्टेंबर इ.स. २००६ पासून-)
सहकार
माजी संचालक : महानंद
संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
संचालक : श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जि. पुणे
संचालक : माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
संचालक : सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
संचालक : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे
संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, पुणे
माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – (मार्च इ.स. १९९१ ते ऑगस्ट इ.स. १९९१ व डिसेंबर इ.स. १९९४ ते डिसेंबर इ.स. १९९८)
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – डिसेंबर, इ.स. १९९८ ते ऑक्टोबर, इ.स. १९९९
क्रीडा
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – (सप्टेंबर इ.स. २००५ ते मार्च २०१३)
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – (ऑगस्ट ,इ.स. २००६ पासून-)
अध्यक्ष : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – (मार्च २०१३ पासून-)
संसदीय राजकारण
लोकसभा सदस्य : जून, इ.स. १९९१ ते सप्टेंबर, इ.स. १९९१.
विधानसभा सदस्य :
इ.स.१९९१ इ.स. १९९५ ते इ.स. १९९९, इ.स. १९९९ ते इ.स. २००४, इ.स. २००४ ते इ.स. २००९, इ.स. २००९ ते २०१४, इ.स.२०१४ ते २०१९, इ.स.२०१९ ते २०२४, २०२४-आजतागायत
मंत्रीपदे
राज्यमंत्री : कृषी, फलोत्पादन आणि उर्जा – इ.स. १९९१ ते नोव्हेंबर इ.स. १९९२.
राज्यमंत्री : जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते फेब्रुवारी, इ.स. १९९३.
मंत्री – पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन – ऑक्टोबर इ.स. १९९९ ते जुलै इ.स.२००४.
मंत्री – ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे) – इ.स. जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४.
मंत्री – जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – नोव्हेंबर, इ.स. २००४ ते नोव्हेंबर, इ.स. २००९.
मंत्री – जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा – नोव्हेंबर, इ.स. २००९ ते नोव्हेंबर, इ.स. २०१०.
उपमुख्यमंत्री पद
उप मुख्यमंत्री,(वित्त व नियोजन, ऊर्जा) – नोव्हेंबर, इ.स. २०१० ते सप्टेंबर इ.स.२०१२.
उप मुख्यमंत्री(वित्त व नियोजन, ऊर्जा) – डिसेंबर इ.स. २०१२ ते इ.स. सप्टेंबर २०१४.
उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य) – इ.स. २०१९ ते इ.स. २०१९.(२ दिवसाचे)
उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य ) – जुलै इ.स. २०२३.
उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य ) – ५ डिसेंबर. २०२४ पासुन अर्थमंत्री
लोक प्रतिनिधित्व
१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले, नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ असे सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.
महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
२००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी काँग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले, तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते.
















