विकास जम्मू काश्मीरचा : जम्मू-काश्मीरमधील रस्ते उभारणी, समृद्धीची पायाभरणी

राष्ट्रीय लेख
Spread the love

जम्मू-काश्मीरमधील रस्ते उभारणी, समृद्धीची पायाभरणी

Building roads, laying the foundation of prosperity in Jammu and Kashmir

https://news24pune.com/?p=946

सक्षम अशा भौतिक पायाभूत सुविधांची उपलब्धता, हा एखाद्या क्षेत्राची वाढ आणि विकासाच्या दृष्टीने अनेकदा सर्वात महत्वाचा घटक असतो. या अनुषंगाने लोकांची आणि वस्तूंची वाहतूक करणारे रस्ते आणि महामार्ग यांना देशाच्या रक्तवाहिन्या म्हटले जाते आणि कोणत्याही प्रदेशाच्या वाढीच्या, विकासाच्या आणि समृद्धीच्या दृष्टीने त्यांचे महत्व अनन्यसाधारण ठरते. मात्र, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासारख्या काही भागांमध्ये, दुर्गम प्रदेश आणि अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे रस्तेसंबंधी पायाभूत सुविधांचा विकास करणे, हे अभियंत्यांच्याच नाही तर धोरण आखणाऱ्यांच्या दृष्टीने देखील एक आव्हान ठरते. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या भागातील रस्तेसंबंधी पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.

Building roads, laying the foundation of prosperity in Jammu and Kashmir

या भागात सर्व प्रकारच्या हवामानात संपर्क परिस्थिती सुधारण्याच्या हेतूने सीमा रस्ते संघटना (बीआरओ), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (एनएचआयडीसीएल) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) अशा अनेक अंमलबजावणी संस्थांनी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. सीमा रस्ते संघटना प्रामुख्याने राष्ट्रीय सुरक्षासंबंधी पायाभूत सुविधांच्या दृष्टीनेमहत्वाचे प्रकल्प राबविते तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (एनएचआयडीसीएल) तर्फे या क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असे काही प्रकल्प राबविले जातात.

या केंद्रशासित प्रदेशात सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून जम्मूची राजधानी श्रीनगर आणि लडाखची राजधानी लेह या शहरांना जोडण्याचे नियोजन आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे श्रीनगर-जम्मू-लखनपूर (राष्ट्रीय महामार्ग-44) मुख्यमहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, त्यान्वये उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांतर्गत 235 कि.मी. अंतराचा एक मोठा भाग पूर्ण झाला आहे, तर उर्वरित भागांचे काम वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहे. या प्रकल्पातल्या महत्वाकांक्षी चेनानी-नाशरी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. महामार्गावर स्वयंचलित एकात्मिक बोगदा नियंत्रण प्रणाली असलेला हा 9 किमी लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे. या बोगद्यामुळे बर्फाच्छादित असणारा पटनीटॉप टाळणे शक्य होणार असून सर्व प्रकारच्या हवामानात राजधानीच्या दोन्ही शहरांमध्ये वाहतूक सुरळीत राहणार आहे. दुसरीकडे पीर पंजल परिसरात काजीगुंड-बनिहाल बोगद्याचे काम सुरू आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर चेनानी- नाशरी बोगद्यासह प्रवासाचे अंतर सुमारे 50 कि.मी.ने कमी होणार आहे. मार्च 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असून त्यामुळे प्रतिदिन 27 लाख रूपये मूल्याच्या इंधन आणि वेळेची बचत होईल.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या अशा जम्मू काश्मिर मेखला मार्गाच्या ग्रीनफील्ड  प्रकल्पांच्या विकसनाचे कामही सुरू आहे. या मेखला मार्ग प्रकल्पांमुळे शहरांच्या औद्योगिक विकासाला हातभार लागेल, शहरांमधली गर्दी कमी होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि परिणामी जम्मू आणि श्रीनगर शहरांमध्ये आर्थीक घडामोडींना वेग येईल.

दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित(एनएचआयडीसीएल) ला राष्ट्रीय महामार्ग 144A, 244 आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्वाच्या इतर महामार्ग विकसनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यासाठी सुमारे 11,812 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.राष्ट्रीय महामार्ग 144A वरील जम्मू अखनूर हा संरक्षणदृष्ट्या महत्वाचा रस्ता असून राज्यातला सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता आहे. तो राजौरी आणि पूंछला देशाच्या इतर भागांशी जोडतो. आजघडीला मऱ्ह, कन्ना चक येथील आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत पोहोचणारा जम्मू- अखनूर हाएकमेव मार्ग असून, तो जम्मू मधील सर्वात जास्त रहदारीनेगजबजलेला रस्ता आहे. रूंदीकरणानंतर या प्रकल्पांतर्गत बांधल्या जाणाऱ्या रस्त्यामुळे केवळ जम्मू शहरातली वाहतूक कोंडी कमी होणार नाही तर संरक्षण दलाची वाहने कमी वेळात आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत पोहोचू शकतील.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित तर्फे विकसित केला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 244 हा काश्मिर खोऱ्यापर्यंत पोहोचणारा पर्यायी मार्ग आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. 244 वरील चेनानी सुधमहादेव प्रकल्पामुळे उधमपूर जिल्ह्यातील मागास आणि ग्रामीण भाग जोडला जाणार आहे आणि डोडापर्यंत सुरक्षितपणे पोहोचणे शक्य होणार आहे. अभियांत्रिकी  खरेदी आणि  निर्माण अर्थात ईपीसीच्या 698 कोटी रूपये मूल्याच्या निविदा प्रदान करण्यात आल्या आहेत आणि त्याअधीन अंमलबजावणी सुरू आहे. 8,599 कोटी रूपये मूल्याचे नवे ईपीसी प्रकल्प निविदा टप्प्यावर असून चालू वर्षात त्या बहाल केल्या जातील, अशी अपेक्षा आहे. अलीकडेच 24 जून 2020 रोजी 2,378 कोटी रुपये मूल्याच्या बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावरील महत्वाच्या प्रकल्पाचे बांधकामही सुरू झाले आहे.

जेड-मोड़ आणि जोजिला  बोगद्याचाउल्लेख केल्याशिवाय जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील विद्यमान रस्ते विकास प्रकल्पांचे महत्त्व पुरेसे अधोरेखित होणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या श्रीनगर, कारगील आणि लेहला जोडणारे हे बोगदे राष्ट्रीय महामार्ग 1 वर तयार करण्यात आले आहेत. हिमस्खलनामुळे या रस्त्याच्या काही भागांमध्ये सुमारे 40 फूट बर्फ जमा होते आणि त्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान ते बंद राहतात. वरचेवर हिमस्खलन होत असणाऱ्या भागातील या बोगद्यांमुळे आणि इतर रचनांमुळे सर्व प्रकारच्या हवामानात या प्रदेशातील वाहतूकसुरळीत राहील. जेड-मोड़ प्रकल्पाचे काम सुरू असून त्यात 6.5 कि.मी. बोगदा आणि 6कि.मी.रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.बालटाल आणि मीनामार्ग दरम्यान 14 कि.मी. लांबीचा जोजिला बोगदा आहे आणि समुद्रसपाटीपासून 11,578 मीटर उंचीवरचा आशिया खंडातला रस्तेमार्गावरचा तो सर्वात लांब बोगदा असेल. हा बोगदा पूर्ण झाल्यावर एकूण प्रवासाची वेळ 2 तासांनी कमी होईल. पुढे दिल्ली-अमृतसर-कटरा हरीत द्रुतगती मार्ग प्रकल्प विकसित झाल्यानंतर दिल्ली-कटरा अंतर 50 कि.मी.ने कमी होईल. त्यामुळे राष्ट्रीय राजधानीशी जास्त चांगली आर्थिक देवाणघेवाण शक्य होईल. प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच आणि नाशवंत शेती उत्पादनांचा होणारा अपव्यय टाळता येईल, त्यांना अधिक चांगला मोबदला मिळवून देणारी बाजारपेठही उपलब्ध होईल.

या प्रकल्पांमुळे केंद्रशासित प्रदेशांतील रस्तेसंबंधी पायाभूत सुविधा सुधारतील, त्याचबरोबर प्रकल्पांचे बांधकाम आणि संबंधित कामाच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होतील. या आणि भविष्यातील इतर प्रस्तावित प्रकल्पांमुळे औद्योगिक वाढ, पर्यटनातील वाढ, तीर्थयात्रेची सुलभता आणि एकूणच आर्थिक समृद्धी असे दुय्यम आणि महत्वाचे परिणामही साध्य होतील. धोरणात्मक दृष्ट्याजम्मू-काश्मीरचे महत्त्व लक्षात घेता, या प्रकल्पांच्या गेल्या वर्षभरातीलअंमलबजावणीवर सातत्याने लक्ष केंद्रित केल्यास, केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत भागांबरोबरच देशाच्या इतर भागांसोबत संपर्क सुधारण्यासाठी, भक्कम आणि सक्षम असे रस्ते जाळे विकसित करण्यावर भर दिला जात असल्याचे लक्षात येते.

—मोहम्मद अतहर (सैफ)

(*या लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून प्राप्त प्रकल्पविषयक तपशील यात समाविष्ट आहेत.)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *