माऊली – एक कालातीत परंपरा: पुण्यात १२ जुलै रोजी बाला देवी चंद्रशेखर यांचा भरतनाट्यम कार्यक्रम


पुणे(प्रतिनिधी ):-“भक्ती, परंपरा, कला व ईश्वर यांच्यातील कालातीत संबंधाचा उत्सव म्हणजे ‘ माऊली-एक कालातीत परंपरा’ आहे.  पंढरपूर वारीचा आत्मा जिवंत करणारी ही  कला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम् कलाकार, नृत्यदिग्दर्शक आणि संशोधक कलाईमामनी बाला देवी चंद्रशेखर यांच्या भरतनाट्यमचा कार्यक्रम पुणेकरांना अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम रविवार दि.१२ जुलै रोजी कोथरुड, मयूर कॉलनी येथील एमईएस सभागृहात सायंकाळी ५ ते ६.१५ वाजेपर्यंत होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.” अशी माहिती फ्युएल शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नृत्यांगणा, भरतनाट्यम कलाकार, नृत्यदिग्दर्शक आणि संशोधक कलाईमामनी बाला देवी चंद्रशेखर, फ्युएल च्या विभागप्रमुख प्रा. प्राची अहिरराव आणि श्री. चंद्रशेखर उपस्थित होते.
डॉ. केतन देशपांडे यांनी सांगितले की,” सीएसआरच्या माध्यमातून मोफत शिक्षण देणाऱ्या फ्युएल शैक्षणिक संस्थेतील १० मुलींच्या शिक्षणाला सहाय्य करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाला देवी चंद्रशेखर यांनी संतांच्या अभंगांच्या ओव्या एकसंधपणे जोडून संपूर्ण वारकरी सांप्रदायाचा प्रवास रंगमंचावर साकार करणार्‍या पहिल्या नर्तकी आहेत. वारकरी परंपरेतील अभंग आणि तत्वचिंतनात्मक वाणी यांमधून प्रेरणा घेऊन त्या प्रत्येक भक्तिगीताला एक जिवंत, अखंड यात्रेत रुपांतरित करतात. वारीच्या आध्यात्मिक, भावनिक आणि सामूहिक अनुभूतीचे प्रतिबिंब आहे. या मैलाचा दगड ठरलेल्या निर्मितीत रंगमंचच एक पवित्र मार्ग आहे. येथे काव्य, तत्वज्ञान आणि नृत्य यांच्या एकत्र येण्याने पंढरपूच्या अखंड भक्तीचा आत्मा साकार होतांना दिसत आहे. बाला देवी चंद्रशेखर यांनी ४० पेक्षा अधिक देशांमध्ये ३०० पेक्षा जास्त जागतिक मंचांवर भारतीय शास्त्रीय नृत्य सादर केले आहे.”
कलाईमामनी बाला देवी चंद्रशेखर यांनी सांगितले की,” माऊली- अ टाइमलेस ट्रेडिशन ही संकल्पना पंढरपूच्या पवित्र वारीतून प्रेरणा घेते. वारी ही तीर्थयात्रा नाही तर तो अंतर्मनाचा प्रवास आहे. माऊली मध्ये या प्रवासाची परिणती एका परिवर्तनात होताना दिसते. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि जनाबाई यांसारख्या वारकरी संतांचे जीवन आणि त्यांचे अभंग भरतनाट्याच्या माध्यमातून साकार करुन हा प्रवास उलगडला जाणार आहे. जिथे भक्त केवळ ईश्वराचे दर्शन घेऊन परत येत नाही, तर त्या ईश्वरी तत्वाला आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो.  पंढरपूर वारीचा आत्मा जिवंत करतो.”या कार्यक्रमात संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव , एकनाथ महाराजांचे विविध अभंग आणि भारुडांचा समावेश आहे. मुख्यता उदंड पाहिले उदंड ऐकिले, सुंदर ते ध्यान, रुप पाहता लोचनी, खेळ मांडीयेला वाळवंटी घाई आणि कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा चा समावेश आहे.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  भिडे वाडा जमीनदोस्त : राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार