पुणे(प्रतिनिधी)–केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे स्नॅपचॅटवरील जुने संभाषण समोर आल्याने या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. घटना घडण्याच्या तब्बल २२ दिवस आधीच सियाने हे लग्न होणार नाही, असे विधान आपल्या एका मित्राकडे केल्याचे या व्हायरल चॅट्समधून स्पष्ट होत असून, यामुळे हत्येचा कट आधीच रचला गेला होता का, असा संशय बळावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिया गोयल सध्या केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असून, तिला नुकतीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच सियाचे २६ मे रोजीचे स्नॅपचॅटवरील संभाषण उघड झाले आहे. या संभाषणात सिया आपल्या एका मित्राला उद्देशून म्हणते की, “तुझे ओळखपत्र पाठवून दे, मला लग्नाचे तिकीट काढायचे आहे.” यावर तिने पुढे केलेले विधान अत्यंत धक्कादायक आहे; ती म्हणते, “लग्न होणार नाही, तरीही मी तुझे तिकीट काढून ठेवते.” या मेसेजला उत्तर देताना तिच्या मित्राने ‘ओक्के’ म्हणत व्हॉट्सअॅपवर ओळखपत्र पाठवत असल्याचे सांगितले आहे.
मे महिन्याच्या अखेरीस, म्हणजेच लग्नाच्या अनेक दिवस आधीच सिया इतक्या आत्मविश्वासाने ‘लग्न होणार नाही’ असे का बोलत होती, हा आता तपासाचा मुख्य विषय बनला आहे. यावरून तिला हे लग्न सुरुवातीपासूनच मान्य नव्हते किंवा तिने हे लग्न रोखण्यासाठी आधीच काही योजना आखली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या व्हायरल चॅट्समध्ये ज्या मित्राशी सिया संवाद साधत आहे, तो नेमका कोण आहे आणि या प्रकरणात त्याची काय भूमिका आहे, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
















