पुणे(प्रतिनिधी)–संत ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याची परंपरा यंदा विज्ञानाची जोड देऊन अधिक ‘हायटेक’ करण्यात आली आहे. माउलींच्या पालखीसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन चांदीच्या रथाचे वजन पूर्वीच्या तुलनेत चक्क एक टनाने कमी करण्यात आले आहे. यामुळे रथ ओढताना बैलांची होणारी ओढाताण थांबणार असून, भाविकांनाही सुलभ दर्शन घडणार आहे.
आळंदीजवळील चिंबळी येथे हा नवा रथ साकारण्यात आला आहे. जुना रथ अडीच टन वजनाचा असल्याने चढ-उताराच्या वाटेवर बैलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. ही अडचण ओळखून देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २५ लाख रुपये खर्चून हा नवीन रथ तयार करण्यात आला आहे. रथाचे वजन दीड टनांवर आणण्यात यश आले आहे.
तंत्रज्ञानाची जोड
या रथाच्या निर्मितीत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. रथाचे वरचे स्ट्रक्चर फायबरचे असून त्यावर अष्टेकर ज्वेलर्सच्या मदतीने चांदीचे इलेक्ट्रोप्लेटिंग करण्यात आले आहे. बॅटरी काढून टाकून अत्याधुनिक बेअरिंग आणि कपलिंगचा वापर केल्यामुळे रथाची चाल अधिक सुलभ झाली आहे.
सुरक्षेसाठी ‘हायटेक’ यंत्रणा
रथावर आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे गर्दीच्या वेळीही चोख सुरक्षा ठेवता येईल. रथाच्या दर्शनी भागात माउलींच्या मूर्तीसह सूर्य, गरुड, हनुमान आणि जय-विजय यांच्या आकर्षक प्रतिकृती बसवण्यात आल्या आहेत. आगामी ८ जुलै रोजी होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी हा रथ माउलींच्या चरणी अर्पण केला जाणार असून, वारीपूर्वी त्याची प्रत्यक्ष चाचणीही घेण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे यंदाचा पालखी सोहळा अधिक शिस्तबद्ध आणि सुलभ होणार आहे.















