पुणे: “आजच्या काळात राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे. ‘तुमच्या लिहिण्याने आमची सत्ता जात नाही आणि येतही नाही’ असा जो अहंकारी समज राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे, तो मोडीत काढण्याची ताकद केवळ पत्रकारांच्या एकजुटीत आहे,” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर आसूड ओढले. पुण्यातील वरुणराज भिडे पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी केवळ पत्रकारिताच नव्हे, तर मराठी शाळा, जमिनींचे राजकारण आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरही भाष्य केले.
पत्रकारांवरील राजकीय दबावावर सडकून टीका
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, अनेक अनुभवी आणि चांगले पत्रकार आज मंत्र्यांच्या दरबारात काम करताना दिसत आहेत, ही अत्यंत भयानक गोष्ट आहे. सरकार किंवा मालकांकडून जर बातमी दाबण्यासाठी दबाव येत असेल, तर पत्रकारांनी एकत्र येऊन अशा नेत्यांच्या चांगल्या-वाईट सर्वच बातम्या प्रसिद्ध करणे बंद केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. “तुम्ही एकदा बातम्या देणे बंद करा, मग बघा हे नेते कसे ताळ्यावर येतात,” असा रोखठोक पवित्रा त्यांनी घेतला. अनेक तरुण पत्रकारांना क्रांती करायची असते, पण घराचे हप्ते (EMI) आणि नोकरी टिकवण्याच्या विवंचनेत त्यांचा आवाज दाबला जात असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
मराठी शाळा नव्हे, तर ‘जागा’ लाटण्याचा धंदा
राज्यातील मराठी शाळांच्या दुरवस्थेवर बोलताना त्यांनी एक धक्कादायक आरोप केला. त्यांच्या मते, महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत नसून, त्या शाळांच्या मोक्याच्या जागा लाटण्याचे मोठे कारस्थान सुरू आहे. मंत्रालयातून हलणाऱ्या फाईल्स या शाळा सुधारण्यासाठी नसून, त्या जमिनी कोणाला तरी देण्यासाठी असतात, असा दावा त्यांनी केला. सध्या राज्यात केवळ ‘लँड माफिया’ आणि ‘जागा विकणे’ हाच मुख्य धंदा सुरू असून, त्यात मराठी शाळांचा बळी दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्याच्या नियोजनाचा पुरता बोजवारा
पुणे शहराच्या वाढत्या व्यापावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, “मी २५ वर्षांपूर्वीच मुंबई आणि पुण्याची वाट लागेल असा इशारा दिला होता.” आज पुण्याचे पाच वेगवेगळे भाग झाले असून, या शहराला कोणताही आकार उरलेला नाही. अनधिकृत बांधकामे आणि झोपडपट्ट्या वाढण्यामागे कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. कोणत्याही राज्यकर्त्याला किंवा लोकप्रतिनिधीला “हे माझे शहर आहे” अशी आत्मीयता वाटत नसल्यानेच पुण्याची ही अवस्था झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.
परप्रांतीय आणि भाषेचा स्वाभिमान
परप्रांतीयांना मराठी शिकवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी इतर राज्यांची उदाहरणे दिली. तामिळनाडू, बंगाल किंवा गुजरातमध्ये कोणीही हिंदीत बोलण्याची हिंमत करत नाही, कारण तिथले लोक आपल्या भाषेबद्दल कमालीचे ठाम आहेत. “जिथे जमीन भुसभुशीत असते, तिथेच घुशी शिरतात,” अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रातील मवाळ धोरणावर टीका केली. स्वतःच्या राज्यात सुधारणा न करणाऱ्या ‘भैय्यांना’ इथे मराठी शिकवून काय साध्य होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तरुणाईला मुद्दाम गुंतवून ठेवले जातेय
सध्याच्या पिढीला मूळ प्रश्नांपासून दूर ठेवण्यासाठी राज्यकर्ते आयपीएल (IPL), २०-२० क्रिकेट, कॉन्सर्ट्स आणि इंस्टाग्राम सारख्या गोष्टींचा वापर करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. तरुणांनी या आभासी जगात न अडकता सरकारला जाब विचारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. शेवटी, १ मे या महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी खंत व्यक्त केली की, ज्या हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली, त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील मराठी माणूस मोठ्या संख्येने एकत्र येत नाही. ही जाणीव जोपर्यंत जिवंत होत नाही, तोपर्यंत मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात राहील, असा गर्भित इशारा देत त्यांनी आपले भाषण संपवले.















