अहमदनगर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांना ७० हजार मताधिक्याने दणदणीत विजय मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त करत, “कडू बोलणारेच खरे कामाचे, गोड बोलणारे फक्त बोलून निघून जातात,” असा सणसणीत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला. मतदारांनी प्रचाराविना दिलेल्या मताधिक्यामुळे आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी नमूद केले.
निळवंडे जलपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला आणि राजकीय विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी विकासकामे आणि लोकांवरील विश्वास यावरच आपले राजकारण आधारित असल्याचे स्पष्ट केले.
‘काम केल्याची पावती मिळाली’
विधानसभा निवडणुकीतील आपल्या विक्रमी मताधिक्यावर बोलताना ते म्हणाले की, “काही लोक कितीही विरोधात असले आणि पैसे वाटले तरी मतदारसंघातील गोरगरीब जनता, लाडक्या बहिणी, शेतकरी आणि युवक आपल्यासोबत आहेत.” प्रचाराची फारशी गरज नसतानाही मतदार मतदान करायला येतो, हेच काम केल्याची पावती असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
विरोधकांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल
विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, “विरोधक केवळ भाषणे देतात आणि धमक्या देतात. भाषणांनी लोक मतदान करत नाहीत.” केवळ आश्वासने देऊन किंवा गोड बोलून लोकांना भेळ खायला घालणारे लोकप्रतिनिधी पाहिले आहेत, पण ते पाणी देत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. नुसती बडबड करून उत्तर देणे हे घाबरलेल्या माणसाचे काम असते. कृतीतून उत्तर देण्यासारखा आनंद दुसऱ्या कुठल्याच कामात नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. जे लोक नुसती भाषणे देऊन गेले, त्यांना आपण निवांत केल्याचेही त्यांनी मिश्किलपणे नमूद केले.
गणेश कारखाना आणि अंतर्गत विरोधाबद्दल खंत
गणेश कारखान्याला जीवनदान देऊन प्रवरा कारखान्याने सात वर्षे १०० कोटींचा तोटा सहन करून तो चालवला, तरीही निवडणुकीत तिथले काही कामगार आणि संचालक मंडळ विरोधात पैसे वाटत होते, याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली. संचालक मंडळ पैसे वाटत असल्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते, असे त्यांनी सांगितले. “मनात घृणा नाही, पण वेदना आहेत,” असे सांगत, कारखाना म्हणून चालवा, राजकीय वापर करू नका, असे आवाहन त्यांनी केले. प्रवरा सहकारी साखर कारखाना पुढील पाच वर्षांत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा कारखाना करून दाखवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राहुरी कारखान्याच्या भानगडीतही पडणार नसल्याचे त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची तयारी दर्शवली.
‘स्वार्थ नाही, जनतेचे काम हेच ध्येय’
आपल्या मनात द्वेष, लोभ, पैशाची गरज किंवा कोणताही स्वार्थ नाही. ज्या जनतेने विश्वास ठेवला, त्यांच्या प्रश्नांवर काम झाले पाहिजे, हीच एकमेव भावना असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.