नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुगलने ‘गुगल फॉर इंडिया २०२०’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. गूगल फॉर इंडियाची ही सहावी आवृत्ती होती. हा कार्यक्रम प्रथमच वर्चुअली आयोजित करण्यात आला होता. गूगल फॉर इंडिया कार्यक्रमाची सुरुवात गुगल इंडियाचे प्रमुख संजय गुप्ता यांनी केली. ते म्हणाले की गुगल भारतात इतके स्मार्ट झाले आहे की २४ तास अगोदर हवामानाचा अचूक अंदाज वर्तवला जाऊ शकतो. या घटनेनंतर एक संदेश व्हायरल झाला असून असा दावा केला जात आहे की गुगल डिजिटल इंडियाचा प्रचार करण्यासाठी भारतात कमी किंमतीत स्मार्टफोन बाजारात आणेल जेणेकरून फीचर फोन वापरणारे सर्वच स्मार्टफोन वापरण्यास सुरवात करतील.
मात्र, गूगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून या बातमीत काही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. गुगलने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. सत्य हे आहे की सुंदर पिचाई यांनी भारतात स्वस्त स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेटची प्रशंसा केली आहे. स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करण्याची कुठलीही घोषणा त्यांनी केलेली नाही. त्यांनी इंडियन टेलिकॉमच्या पायाभूत सुविधांचे कौतुक केले आहे. सुंदर पिचाई यांचे हे विधान आपण गुगल इंडिया ब्लॉगवर वाचू शकतो.
या कार्यक्रमास संबोधित करताना गुगल आणि अल्फाबेट मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई म्हणाले की, डिजिटल इंडियासाठी गुगल येत्या ५-७ वर्षांत ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. गुगलची ही गुंतवणूक इक्विटी इनवेस्टमेंट, पार्टनरशिप आणि ऑपरेशनल इंफ्रास्ट्रक्चर इकोसिस्टम इंडस्ट्रीमध्ये असेल.
गुगलने सीबीएसईबरोबर भागीदारीची घोषणा देखील केली आहे ज्या अंतर्गत ई-लर्निंगचा विस्तार केला जाईल आणि देशातील २२ हजार शाळांमधील १० लाख शिक्षकांना ई-वर्ग विषयी प्रशिक्षण दिले जाईल. जेणेकरून ते त्या भागामध्ये कमी किंमतीत मुलांना उच्च शिक्षण प्रदान करू शकतील.