दडपशाहीविरुद्ध अरबांचा अथक संघर्ष वाखाणण्याजोगा – माजी राजदूत तालमीझ अहमद

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- वसाहतविरोधी लढ्यापासून ते आजतागायत अरब जनतेने दडपशाहीविरुद्ध सातत्याने प्रतिकार केला आहे. अरब क्रांतीच्या प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य या तत्वाचे सर्वजण समर्थन करतात. अनेक अडचणी असूनही ते हार मानत नाहीत. अरबांचा हा दडपशाहीविरुद्ध अथक संघर्ष वाखाणण्याजोगा आहे.  त्यांच्या गुणाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे मत सौदी अरेबियातील भारताचे माजी राजदूत तालमीझ अहमद यांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे सौदी अरेबियातील भारताचे माजी राजदूत तालमीझ अहमद  लिखित “वेस्ट एशिया अॅट वॉर: रिप्रेशन, रेझिस्टन्स अँड ग्रेट पॉवर गेम्स” या पुस्तकाचे प्रकाशन आणि चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. चीन, भूतानमधील भारताचे माजी राजदूत आणि पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त गौतम बंबावाले, सिम्बायोसिस स्कूल फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे प्राध्यापक अल्विते सिंग हे चर्चेत सहभागी झाले होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संचालक अभय वैद्य यावेळी उपस्थित होते.

अहमद म्हणाले की, अरब क्रांतीने काही आशा निर्माण केल्या होत्या, परंतु लोकशाही व्यवस्थेत कोणताही बदल दिसला नाही. एकाही अरब राज्याने राज्याच्या निर्णय प्रक्रियेत लोकप्रिय सहभागाची एकही संधी उपलब्ध करून दिली नाही, राष्ट्रीय आर्थिक खाती पारदर्शक नाहीत, तेल महसूल कमी होत आहे. राज्याच्या प्रत्येक आदेशाच्या घटकांचे तज्ञांद्वारे विश्लेषन केल्यानंतर ही व्यवस्था शाश्वत नसल्याचे त्यांनी सुचविले आहे. परंतु, यामध्ये कोण आणि कसे बदल घडवून आणणार याचे कोणतेही संकेत नाहीत. तसेच लोकांना त्यांचे जीवन सुखकर होईल यासाठी सत्ताधारी वरून सुधारणा घडवून आणतील असे कोणतेही संकेत दिसत नाहीत. पश्चिम आशियात सर्व काही आलबेल आहे असे वरवर वाटत असले तरी मूळतः कमकुवत आहे, असे ते म्हणाले.

अहमद पुढे म्हणाले की,  मी या प्रदेशाशी चार दशकाहून अधिक काळ जोडला गेला असून कोरोना काळात या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. हे पुस्तक लिहिताना या प्रदेशाबद्दल कुतूहल असणार्‍या भारतीयांना समोर ठेऊन मी हे पुस्तक लिहिले आहे.  पुण्यात घालवलेल्या काळातील आठवणींना उजाळा देताना तालमीज अहमद म्हणाले की, मी 1964 मध्ये अभ्यासासाठी पुण्यात आलो आणि मला या शहराविषयी आणि महाराष्ट्र राज्याबद्दल खूप जिव्हाळा निर्माण झाला आहे.

गौतम बंबावाले म्हणाले की,  या पुस्तकामध्ये पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेबाबत प्रकाश टाकण्यात आला आहे,ज्याला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात WANA असे म्हटले जाते. पश्चिम आशियामध्ये सतत युद्ध कसे सुरू असते, दडपशाही आणि जागतिक महासत्तेच्या खेळात पश्चिम आशिया कसा असतो याचे सविस्तर विवेचन या पुस्तकात केले असल्याचे त्यांनी सांगितले. या भौगोलिक परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी अहमद यांनी  इतिहासाच्या बारकाव्यांचे संदर्भ घेतले आहेत.                 

पश्‍चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असून तेथे 8 दशलक्ष भारतीय कार्यरत आहेत. दोन दशकांपासून भारताने हे परिस्थिती बऱ्यापैकी हाताळली असून पश्चिम आशियाशी संबंध प्रस्थापित करताना भारताने पाकिस्तानला मात्र, त्यापासून दूर ठेवले आहे असे ते म्हणाले.

सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे सहायक प्राध्यापक अल्विते सिंग म्हणाले की, हा प्रदेश कधीही कंटाळवाणा वाटत नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *