सुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला की त्याला भेटीसाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागले. ज्या दरवाजाबाहेर त्याला साधी एन्ट्रीही मिळाली नव्हती, आज नियतीने असे काही चक्र फिरवले आहे की त्याच कार्यालयातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची त्याने हस्तगत केली आहे. हा कोणत्याही मोठ्या तमिळ चित्रपटाचा सीन नसून, दाक्षिणात्य सुपरस्टार ‘थलपती विजय’ याच्या आयुष्यातील खरीखुरी स्क्रिप्ट आहे. ज्या विजयला १३ वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी साधी भेटही नाकारली होती, तोच विजय आज राज्याच्या सत्तेच्या चाव्या हातात घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसला आहे,
हा संपूर्ण किस्सा २०१३ सालचा आहे. त्या वेळी विजयचा ‘थलैवा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाची टॅगलाईन होती ‘टाइम टू लीड’ (Time to Lead) म्हणजेच ‘नेतृत्व करण्याची वेळ आली आहे’. ही साधी टॅगलाईन आणि विजयची राज्यातील प्रचंड वाढती लोकप्रियता पाहून तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांचे सरकार हादरले होते. विजय या टॅगलाईनच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणार की काय, अशी शंका जयललिता यांच्या मनात आली. यातूनच असा काही संघर्ष सुरू झाला जो विजयसाठी भयंकर ठरला. विजयचा चित्रपट प्रदर्शित झाला तर थेट बॉम्बने उडवून टाकू, अशा धमक्या दिल्या गेल्या आणि अखेर सरकारने सुरक्षेचे कारण पुढे करून चित्रपटावर बंदी घातली.
या बंदीमुळे विजयचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार होते. जर चित्रपट प्रदर्शित झाला नसता, तर सुपरस्टार विजय अक्षरशः रस्त्यावर येऊ शकत होता. आपल्या निर्मात्याला वाचवण्यासाठी आणि चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विजयने स्वतः मुख्यमंत्री जयललिता यांची भेट घेण्याचे ठरवले. तो कोदनाडपर्यंत गेला आणि तिथे त्याने मुख्यमंत्र्यांची तासनतास वाट पाहिली. ज्या सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोक ताटकळत उभे असतात, त्या अभिनेत्याला एका भेटीसाठी स्वतः ताटकळत राहावे लागले, पण त्याला भेट मिळालीच नाही. हा अपमान इतका मोठा होता की, विजयला शेवटी एक भावनिक व्हिडिओ जारी करावा लागला. हात जोडून त्याने विनंती केली की, माझा चित्रपट राजकीय नाही, तो प्रदर्शित होऊ द्या. शेवटी ‘टाइम टू लीड’ ही टॅगलाईन हटवल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित झाला.
विजयनं तो अपमान गिळला होता, पण तो विसरला नव्हता. म्हणतात ना, सिंहाने दोन पावलं मागे घेतली तर तो घाबरलेला नसतो, तो मोठ्या शिकारीची तयारी करत असतो. तो अपमान विजय विसरला नव्हता, पण त्याने तो गोंगाट करून व्यक्तही केला नाही. सिंहाने घेतलेली ही दोन पावलं मागे म्हणजे मोठ्या शिकारीची तयारी होती. पुढची १३ वर्षे विजयने अत्यंत शांत राहून आपलं संघटन मजबूत केलं. त्याने केवळ चित्रपट केले नाहीत, तर आपल्या चाहत्यांच्या माध्यमातून ‘विजय मक्कल इयक्कम’ या संघटनेचे जाळे संपूर्ण राज्यात विणले. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याने ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या आपल्या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. २०२६ च्या विधानसभा निवडणुका आल्या आणि विजयने थेट मैदानात उडी घेतली. सुरुवातीला अनेकांना वाटले की सिनेमा आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा संपूर्ण देश चकित झाला.
विजयच्या पक्षाने ११० जागा जिंकून केवळ ‘किंगमेकर’ नाही तर ‘किंग’ ठरण्याचा पराक्रम केला. ज्या सिनेमाची टॅगलाईन काढायला लावली होती, त्याच विजयने आज स्वतःचे शासन आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आज परिस्थिती अशी बदलली आहे की, दिल्लीपासून चेन्नईपर्यंतचे मोठे नेते त्याला भेटण्यासाठी रांगेत उभे आहेत. ज्याला एकेकाळी भेट नाकारली होती, तो आता तामिळनाडूचा मुख्यमंत्री झाला आहे.



















