What if you just keep filling your own house while developing?

विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसे होणार? – रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचले

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे– ⁠काम करताना विचार सोडला तर तो विकास होत नाही. विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसे होणार? त्यामुळे विकासाचा मुद्दा पुढे आणण्यापेक्षा विचार हा जास्त महत्त्वाचा आहे, असा टोला आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांना लगावला. ब्रिटिश किती ताकदवान आहेत. त्यांची किती देशांमध्ये सत्ता आहे असे म्हणून ब्रिटिशांनी विकास केला, असे म्हणत सामान्य जनता ब्रिटिशांबरोबर गेली असती का? असा सवाल उपस्थित करत आज विचार जास्त महत्त्वाचा असल्याचेही रोहित पवार म्हणाले.

पुण्यामध्ये ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. अजित पवारांच्या माध्यमातून बारामतीचा विकास झाल्याने ते कामाची व्यक्ती असल्याचा प्रचार बारामती मतदारसंघात होत आहे. यावर रोहित पवारांनी ब्रिटिशांचा दाखला देत अजितदादांना लक्ष्य केले.

रोहित पवार म्हणाले, ⁠ब्रिटिशांनी जी वृत्ती वापरून घर आणि माणसे फोडली, तीच वृत्ती आज वापरली जात आहे. विकासाचा विचार केला तर बारामतीमध्ये एमआयडीसी, पुण्यात आयटी आणि धरणे शरद पवार यांच्यामुळे झाली आहेत. तरीदेखील विकासापेक्षा विचार अधिक जास्त म्हत्त्वाचा आहे.

म्हणून ते मला लहान समजत असतील..

अजित पवारांनी रोहित पवारांना बच्चा असा उल्लेख केला होता. तसेच सुनील तटकरे यांनी देखील त्यांना बालवाडीचे अध्यक्ष असे संबोधले होते. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “⁠सिंचनाच्या चिखलात ते अडकले होते. एका घराच्या पत्त्यावर १०० कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. त्यानंतर भाजपसोबत जाऊन कारवाई थांबवली. असे करण्याएवढी बुद्धी माझ्याकडे नाही, त्यामुळे ते मला लहान समजत असतील, असा खोचक टोला रोहित यांनी अजित पवारांना लगावला.

सुनील तटकरे हे अंतुलेंचे कार्यकर्ते होते. नंतर त्यांनी त्यांना सोडले. अंतुलेंना सोडल्यानंतर ते शरद पवारांसोबत आले. आता त्यांनी शरद पवारांनाही सोडले आणि अजितदादांच्या गोटात गेले. वेळ आली की ते भविष्यात अजितदादांनाही सोडून भाजपत जातील. हे पाहता तटकरेंच्या एवढी बुद्धी माझ्यात नसल्याची टीकाही रोहित पवारांनी केली.

आंबेडकरांना आवाहन

भाजप नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे त्यांना फायदा होईल, अशी भूमिका आंबेडकर घेणार नाहीत. त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर ती कार्यकर्ते, जनतेला पटणार नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा विचार करून महाविकास आघाडीसोबत यावे, असे आवाहन रोहित पवारांनी केले आहे.

सुप्रिया सुळे 3 लाख मतांनी निवडून येतील

भाजपचे नेते शरद पवारांना राजकारणातून संपवण्याची भाषा करत आहे. पवार कुटुंबातील माणसे फोडून भाजपच हा कुटील डाव साधण्याचा प्रयत्न करत असून, जनतेला हे पटणार नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे बारामतीतून तीन लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *