Reading newspapers is the first step of reading

वृत्तपत्रांचे वाचन ही वाचनाची पहिली पायरी :वृत्तपत्र संपादकांच्या चर्चेतील सूर

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – वृत्तपत्रे (News Paper) ही संस्कृतीची वाहक आहेत. वृत्तपत्रांचे वाचन केल्यास पुस्तकांच्या(Books) वाचनाकडे वळता येईल. वृत्तपत्र वाचन (News Paper Reading) ही वाचनाची पहिली पायरी आहे. वाचनसंस्कृती (reading culture) टिकली, तर वृत्तपत्र टिकणार आहेत. तंत्रज्ञानाचा वापरही वाचनासाठी करता येऊ शकतो, असा सूर वृत्तपत्र संपादकांच्या (Editors) चर्चेत उमटला. (Reading newspapers is the first step of reading)

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (National Book Trust) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात गुरुवारी वाचन संस्कृतीतील माध्यमांचे योगदान या विषयावर वृत्तपत्रांच्या संपादकांचे चर्चासत्र झाले. त्यात लोकसत्ताचे सहायक संपादक मुकुंद संगोराम, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी, सकाळचे निवासी संपादक सम्राट फडणीस, पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी, तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनी सहभाग घेतला.

संगोराम म्हणाले, की  हल्ली कुणीच वाचत नाही असे म्हटले जाते. पण, त्यात काहीतरी गडबड आहे. एकेकाळी साप्ताहिक पुरवण्या ललित साहित्याने भरलेल्या असायच्या, त्याची जागा आता वैचारिक लेखांनी घेतली. लोकांनी वृत्तपत्र वाचली, तर पुस्तके वाचतील. वाचन ही प्रक्रिया आहे. चांगले साहित्य असेल तर लोक नक्की वाचतात, यावर संपादकांनी विश्वास ठेवला पाहिजे. तसेच वाचन सोयीसाठी किंडलवर पुस्तक असायला पाहिजेत.

वृत्तपत्र ही वाचन संस्कृतीचे वाहक आहेत. मराठी साहित्य आणि वृत्तपत्र यांनी हातात हात घालून काम केलं आहे. वाचनाची सवय असली पाहिजे. वाचन हा लेखनाचा रियाज आहे. मुलांनी वाचवण्यासाठी आई वडिलांनी वाचले पाहिजे. त्यासाठी घरात भरपूर पुस्तके ठेवली पाहिजेत. वाचनसंस्कृती टिकली, तर वृत्तपत्र टिकणार आहेत. पुस्तकाची बाजारपेठ अद्याप विकसित झालेले नाही. पुस्तक घेण्याची भूक आहे. प्रकाशक नकारात्मक बोलत आहेत. प्रकाशक व्यवसाय नाही म्हणतात, पण मग ते या व्यवसायात का आहेत? पुस्तकांचे मार्केटिंग झाले पाहिजे. पुस्तके वाचकांपर्यंत जातील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे लोणी यांनी सांगितले. 

सर्वसामान्य लोकांना भाषा कळली पाहिजे, इतकी ती सोपी असायला हवी. वाचकांना कला संस्कृती बाबतच्या घडामोडी पाहिजे असतात म्हणून वृत्तपत्र वाचले जाते. अवांतर वाचण्याची गोडी लावण्यासाठी वृत्तपत्र ही पहिली पायरी असते. पूर्वी वृत्तपत्रांमध्ये मोठे लेख आणि मोठ्या बातम्या असायच्या. आता तितके वाचण्याचा आता वाचकांमध्ये संयम राहिलेला नाही. त्यामुळे वाचनाची बैठक कमी झाली आहे. लेखनाचा केंद्रबिंदूही आता महानगरातून मराठवाडा, विदर्भाकडे सरकला आहे. तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष पुस्तकाचे वाचन यात साधला पाहिजे. पुस्तकाच्या दर्जाबरोबरच त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे. अपेक्षित  वाचकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था असली की लोक नक्की पुस्तक घेतात.  सर्वांनी एकत्र येऊन जाणीवपूर्वक यंत्रणा विकसित केली पाहिजे. संभाव्य वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुण्यात होत असलेला पुस्तक महोत्सव त्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम आहे. असा महोत्सव राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये झाला पाहिजे, असे सुनील माळी यांनी नमूद केले.

सम्राट फडणीस म्हणाले, की वाचन चांगले असले पाहिजे. ते प्रयत्न पूर्वक केले पाहिजे. मोबाईल हा वाचनातील सर्वांत मोठा अडथळा आहे. पण मोबाईलवरही चांगले वाचता येते. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या वाचनासाठी केलं पाहिजे. आताच्या काळात लहान मुलांसाठी वृत्तपत्र काढले पाहिजे. लहान मुलांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुस्तकांचे कॉमिक्समध्ये रुपांतर केलं पाहिजे. लेखनाचा घाट बदलण्याची गरज आहे. मराठी, बंगाली भाषेतील पुस्तकांना चांगले दिवस आहेत.

किरण शेलार म्हणाले, आपल्या देशात पुस्तकाचा दर्जा महत्त्वाचा आहे. दर्जेदार साहित्य असेल तर वाचन चळवळीला मदत होईल. तसेच आपल्याकडे संदर्भ साहित्याला खूप मोठी मागणी दिसत आहे. याचा विचार करून मोठ्या प्रमाणात संदर्भ साहित्याचे निर्मिती केली पाहिजे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *