कृषीऐवजी कार्पोरेट कंपन्यांनाच सरकारचे ‘प्राधान्य’- अजित नवले

अर्थ
Spread the love

पुणे -अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना लॉकडाउन काळात अर्थव्यवस्थेला तगवण्यात शेती क्षेत्राने अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडली असल्याचे मान्य करण्यात आले आहे. कोरोनापश्चात अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने पेलण्यासाठी त्यामुळेच शेती क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही. कॉर्पोरेट कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्र हाच सरकारचा ‘प्राधान्य’क्रम असल्याचे स्पष्ट करणाऱया असंख्य तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, अशा शब्दांत अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी अर्थसंकल्पावर सोमवारी निशाणा साधला.

याबाबत बोलताना ते म्हणाले, शेतीमालाच्या खरेदीच्या क्षेत्रात अर्थमंत्र्यांनी आपली पाठ थोपटून घेत सरकारने खूप चांगली कामगिरी केली असल्याचे वक्तव्य केले आहे. गहू, धान्य, डाळी व कापूस खरेदीसाठी सरकारने मोठय़ा रकमा खर्च केल्याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. या रकमा सरकारने जणू शेतकऱयांना ‘अनुदान’ म्हणून देऊन टाकल्या आहेत, असा ‘समज’ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रत्यक्षात शेतीमालाच्या सरकारी खरेदीसाठी खर्च केलेल्या या रकमेपैकी केवळ आधारभाव व शेतीमालाचा बाजारभाव यातील फरकाइतक्मयाच रकमेची प्रत्यक्ष ‘झळ’ सरकारला बसलेली असते. जाहीर करण्यात आलेल्या आकडय़ांच्या तुलनेत ही ‘झळ’ अत्यल्प असते, हे याबाबत लक्षात घेतले पाहिजे.

दिल्लीतील शेतकऱयांचे आंदोलन आणि शेतीतील अरिष्ट पाहता देशभरातील शेतकऱयांना आधारभावाचे संरक्षण मिळावे, यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल, अशी आशा होती. शिवाय शेतीमाल उत्पादन, वाहतूक, साठवणूक, प्रक्रिया व विक्री क्षेत्रातही सरकारने गुंतवणुकीसाठी हात मोकळा सोडणे अपेक्षित होते. मात्र या संपूर्ण क्षेत्रात कॉर्पोरेट घराण्यांनीच गुंतवणूक करावी व त्या बदल्यात प्रचंड नफा कमवावा, असेच धोरण सरकारने गेल्या काही वर्षात घेतले आहे. सरकारने केलेले तीनही कृषी कायदे याच धोरणांचा परिपाक आहेत. आंदोलनाच्या प्रचंड दबावानंतरही हे कायदे सरकारने मागे घेतलेले नाहीत. शेती क्षेत्रातील गुंतवणुकीतून अंग काढून घेत अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सरकार आपल्या याच कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणांवर ठाम असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

शेतकरी, मजुरांना खड्डय़ात लोटणारे बजेट

मागील अर्थसंकल्पाच्या काळात अर्थव्यवस्थेची ‘पुरवठा’ बाजू मजबूत होती. ‘मागणी’ बाजू मात्र कमकुवत होती. कोरोना लॉकडाऊनमुळे आता मात्र पुरवठा व मागणी अशा दोन्ही बाजू कोसळल्या आहेत. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पात पुरवठा व मागणी दोन्ही बाजूंवर समतोल काम करण्याची आवश्यकता होती. सरकारने मात्र पुरवठा बाजूला बळ देत असताना मागणी बाजूकडे दुर्लक्ष केले आहे. एकंदरीत कॉर्पोरेट घराण्यांना व औद्योगिक क्षेत्राला नफा आणि विकासाची संधी देणारा आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार व ग्रामीण श्रमिक जनतेला उपेक्षित करून आर्थिक विपन्नावस्थेच्या खड्डय़ांमध्ये लोटणारा असा हा अर्थसंकल्प आहे, असे डॉ. नवले यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *