Divya Deshmukh Women’s Chess World Cup 2025 : भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ (Women’s Chess World Cup 2025) चे विजेतेपद पटकावले आहे. केवळ १९ वर्षांच्या दिव्याने जॉर्जियामध्ये (Georgia) झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पीला (Koneru Humpy) पराभूत करून हा ऐतिहासिक विजय मिळवला. यासोबतच, ती विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळ स्टार बनली आहे. नागपूरची कन्या असलेल्या दिव्या देशमुखच्या या विजयाने भारताच्या बुद्धिबळ इतिहासात (Indian Chess History) एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. विशेष म्हणजे, महिला विश्वचषकच्या अंतिम फेरीत दोन भारतीय महिला खेळाडू आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ होती, ज्यामुळे हा मुकाबला आपोआपच भारतासाठी ऐतिहासिक ठरला आणि विजेतेपद भारतालाच मिळणार हे निश्चित झाले.
जॉर्जियातील बाटूमी (Batumi) येथे गेल्या तीन आठवड्यांपासून महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे आयोजन सुरू होते. अंतिम फेरीत दिव्या देशमुख आणि भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर (Grandmaster) कोनेरू हम्पी यांच्यात सामना रंगला. शनिवार, २६ जुलै रोजी झालेल्या पहिल्या क्लासिकल फॉरमॅटमधील (Classical Format) सामन्यात दोन्ही खेळाडू सम-समान राहिले आणि सामना अनिर्णित (ड्रॉ) राहिला. रविवारच्या दुसऱ्या क्लासिकल सामन्याचा निकालही ड्रॉ लागल्याने, विजेतेपदाचा निर्णय टाय-ब्रेकद्वारे (Tie-break) करण्याची वेळ आली. हा टाय-ब्रेक रैपिड फॉरमॅटमध्ये (Rapid Format) खेळला जाणार होता. रैपिड फॉरमॅटमध्ये कोनेरू हम्पी (३८ वर्षे) दिव्याच्या (१९ वर्षे) तुलनेत अधिक मजबूत मानली जात होती, कारण त्या या फॉरमॅटमध्ये दिव्यापेक्षा सरस खेळाडू आहेत. मात्र, सोमवार, २८ जुलै रोजी झालेल्या टाय-ब्रेक सामन्यात दिव्याने आपल्या दुप्पट वयाच्या कोनेरू हम्पीला त्यांच्याच खेळात मात देत जबरदस्त विजयश्री खेचून आणली. दिव्याने ही लढत जिंकत इतिहासात आपले नाव कोरले आहे.
या ऐतिहासिक विजयासह, दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर देखील बनली आहे. विशेष म्हणजे, तिने ही उपलब्धी भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला हरवूनच मिळवली आहे. गेल्या वर्षीच दिव्याने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनचा (Junior World Champion) किताब जिंकला होता. त्यानंतर बुडापेस्टमध्ये (Budapest) झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये (Chess Olympiad) भारतीय महिला संघाला विजेतेपद मिळवून देण्यात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, तसेच या स्पर्धेत तिने वैयक्तिक सुवर्णपदकही जिंकले होते. गेल्या दीड वर्षांपासून दिव्याच्या यशाचा हा चढता आलेख सुरूच आहे आणि आता विश्वचषक जिंकून तिने भारतीय बुद्धिबळ इतिहासात कायमचे स्थान मिळवले आहे.
दिव्याच्या हातात कधीही मोबाईल पाहिला नाही
नागपूरच्या भवन्स बीपी विद्या मंदिर, सिव्हिल लाईन्स शाळेतील क्रीडा विभाग प्रमुख बलबीर कौर (Balbir Kaur) यांनी दिव्याच्या यशाबद्दल बोलताना सांगितले की, दिव्या लहानपणापासूनच एक ‘जन्माची खेळाडू’ होती आणि तिच्या या यशाने त्यांना मुळीच आश्चर्य वाटले नाही. दिव्या शांत, संयमी असून खेळ नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन यात ती खूप कुशल होती. लहानपणापासूनच तिने अभ्यास आणि खेळ यात उत्तम संतुलन राखले. दिव्या अनेकदा दोन-तीन महिने परदेशात स्पर्धांसाठी जात असे, त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापनाने तिच्या उपस्थितीचे (अटेंडन्स) योग्य नियोजन करून तिला पूर्ण सहकार्य केले, ज्यामुळे ती खेळावर लक्ष केंद्रित करू शकली. बलबीर कौर यांनी विद्यार्थ्यांना दिव्याचे उदाहरण देत सांगितले की, त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, खेळ आणि अभ्यास यात संतुलन साधावे आणि मोबाईल फोनपासून दूर राहून शारीरिक तंदुरुस्तीवर भर द्यावा, कारण दिव्याच्या हातात त्यांनी कधीही मोबाईल पाहिला नाही.