मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एक कठोर आणि अत्यंत कार्यक्षम नेता म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांचा एक अप्रतिम कलात्मक पैलू नुकताच समोर आला आहे. राजकारणापलीकडे ते एक कवी (Poet), गीतकार (Lyricist) आणि संगीताचे निस्सीम चाहते (Music Lover) असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले. त्यांचा हा कलात्मक प्रवास निश्चितच अनेक अनपेक्षित पैलूंवर प्रकाश टाकतो.
शनिवारी (दि. 22 जून 2025) मुंबईमध्ये आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव (Maharashtra Radio Festival) आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार (Maharashtra Asha Radio Gaurav Award) समारंभात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी हे खुलासे केले.
फडणवीसांनी स्वतःला “रामदास आठवले (Ramdas Athavale) घराण्याचा कवी” असे संबोधले. कवितेच्या त्यांच्या व्याख्येनुसार, “कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे”. त्यांनी आपल्याच या कवितेच्या काही ओळीही ऐकवल्या: “तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसेना का अर्थ अनर्थ तर असतो? अरे तुम्ही काय कविता कराल, ‘पण’, ‘आणि’, ‘किंवा’, ‘परंतु’ अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे तर, “कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे.” त्यांच्या या काव्याला उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.
कवितेचा छंद आणि गीतांचा प्रवास
फडणवीस यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच कविता लिहिण्याचा छंद जोपासल्याचे सांगितले. ते कवी संमेलनांमध्येही सहभागी होत असत. विशेष म्हणजे, त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांनी कधीही साठवून ठेवल्या नाहीत. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा लिहायचे आणि स्वतःच वाचायचे असा त्यांचा अलिखित नियम होता. सार्वजनिकरित्या फारसे लेखन त्यांनी कधीही केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अलिकडेच त्यांनी दोन गाणी (Songs) लिहिल्याचे सांगितले. यापैकी एक गाणे राम जन्मभूमीच्या (Ram Janmabhoomi) निमित्ताने ‘रामा’वर आधारित आहे, तर दुसरे ‘शंकरा’वर आधारित आहे, जे सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी गायले असल्याचे त्यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त, त्यांनी आणखी एक गाणे लिहिले आहे, जे शोधल्यास सापडेल, पण ते स्वतः ते उघड करणार नाहीत, असे ते म्हणाले.
मॉडेलिंगचा ‘अपघात’ आणि ‘माणूस कुत्र्याला चावला’ म्हण
आपल्या आयुष्यातील एका अपघाती मॉडेलिंगच्या घटनेचीही त्यांनी आठवण करून दिली. हे मॉडेलिंग मित्रांनी केलेल्या प्रँकचा परिणाम होते, पण ते त्यावेळी गाजले. त्यांची तुलना त्यांनी “कुत्रा मनुष्याला चावला तर ती बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते” या म्हणीशी केली, ज्यामुळे त्यांचे मॉडेलिंग गाजले आणि ते सुदैवाने वाचले. त्यानंतर त्यांनी कधीच मॉडेलिंग करण्याची हिंमत केली नाही असे त्यांनी सांगितले.
संगीत आणि राजकारणाचा संबंध
संगीत आणि राजकारण यावरील त्यांच्या विचारांवरही त्यांनी प्रकाश टाकला. राजकीय नेते बाहेरून ‘खडूस’ दिसत असले तरी, आतून ते खूप चांगले असतात. याचे मोठे श्रेय संगीताला जाते, कारण संगीत संवेदनांना जिवंत ठेवते असे त्यांचे मत आहे. सध्याच्या काळात राजकीय नेते दररोज दहा रील्स (Reels) बनवतात आणि प्रत्येक रीलमध्ये संगीतच त्यांना स्वतःची जाहिरात करण्यास मदत करते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, “रोज दहा गाणी आम्ही प्रमोट करतो आणि दहा गाणी आम्हाला प्रमोट करत आहेत”.
संगीतावरील पहिले प्रेम
संगीतावर त्यांचे पहिले प्रेम कॉलेजपासूनच होते. त्यांची सर्वात मोठी ट्रॅजेडी अशी आहे की त्यांना गाणी खूप आठवतात, पण त्यांना एकही सुरात गाता येत नाही. लपून-छपून गाणे त्यांना खूप आवडते. त्यामुळे ते गाणे पूर्ण आवाजात लावतात आणि त्या सुरात आपला बेसुरा आवाज मिसळून गाणे पसंत करतात, जेणेकरून त्यांनाही आपण सुरात आहोत असे वाटते अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली आणि एकच हशा पिकला.