पुणे(प्रतिनिधी)-काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज (शनिवार) पुण्यात होणाऱ्या ‘छात्र की गूंज’ या कार्यक्रमाच्या शुक्रवारी रात्री पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या वसतीगृहामध्ये काँग्रेसचे विद्यार्थी संघटन एनएसयूआय, युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन अनाथ विद्यार्थिनींना हॉस्टेलमध्ये डांबून ठेवल्याच्या आणि त्यांच्यावर दबाव आणल्याच्या गंभीर आरोपावरून सुरू झालेल्या या संघर्षाने रात्री उशिरा हिंसक वळण घेतले. घटनास्थळी पोहोचलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही या गोंधळात धक्काबुक्की सहन करावी लागली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार केला आणि त्यांना हुसकावून लावले. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन अनाथ विद्यार्थिनींचे पालक नसल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून त्यांची स्कॉलरशिप त्यांना मिळाली नव्हती, परिणामी त्यांची फी आणि इतर शैक्षणिक खर्च थकला होता. या संदर्भात कालच युवक काँग्रेसच्या प्रचारादरम्यान या मुलींनी राहुल गांधी यांच्या ‘छात्र की गूंज’ या कार्यक्रमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देत माध्यमांना ऑन-रेकॉर्ड मुलाखत दिली होती. ही बातमी माध्यमांमध्ये चालल्यानंतर कॉलेज प्रशासन आणि अभाविपाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी कॉलेजच्या रजिस्ट्रार यांना तातडीने बोलावून घेण्यात आले आणि त्या विद्यार्थिनींवर “आम्हाला अभावीपमुळेच स्कॉलरशिप मिळाली असून आमची फी भरली गेली आहे” असा खोटा व्हिडिओ किंवा बाईट देण्यासाठी प्रचंड दबाव आणण्यात आला. हा खोटा व्हिडिओ तयार करण्यासाठी त्यांना रात्री आठ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, या दोन्ही अनाथ विद्यार्थिनींनी हा दबाव झुगारून देत खोटे विधान करण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारानंतर संतापलेल्या अभाविपच्या काही कार्यकर्त्यांनी या विद्यार्थिनींना वसती गृहातील त्यांच्या खोलीतच डांबून ठेवले, असा थेट आरोप युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
आपल्या भगिनींवर आणि विद्यार्थिनींवर अन्याय होत असल्याची माहिती मिळताच एनएसयूआयचे कार्यकर्ते तातडीने त्यांना मदत करण्यासाठी वसती गृहात पोहोचले. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना कॉलेजच्या प्रशासनाकडून अत्यंत असहकार्याचा सामना करावा लागला. हॉस्टेलच्या वॉर्डनने काँग्रेस कार्यकर्त्यांना मुलींच्या खोलीकडे जाण्यापासून रोकत सुमारे पंधरा ते वीस मिनिटे बाहेरच थांबवून ठेवले. या दरम्यान कॉलेजमधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करण्यात आली होती आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना ती तपासण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली. जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुलींच्या खोलीत प्रवेश मिळवला, तेव्हा तेथील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. त्या दोन्ही अनाथ मुली कमालीच्या घाबरलेल्या अवस्थेत असून रडत होत्या. भीतीमुळे त्यांना धड बोलणेही अशक्य झाले होते. त्यांच्या वतीने त्यांच्या एका नातेवाईकाने किंवा मित्राने काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही त्यांचे म्हणणे रेकॉर्ड करण्यापासून आणि बोलण्यापासून रोखून तिथून बाहेर पाठवण्यात आले. या धक्कादायक प्रकारानंतर जेव्हा कार्यकर्त्यांनी मुलींचे नाव सांगून विचारणा केली, तेव्हा कॉलेज प्रशासनाने मुलगी झोपली असल्याचे सांगत सुमारे वीस मिनिटे वेळकाढूपणा केला, असा आरोपही एनएसयूआयने केला.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार घटनास्थळी दाखल झाले. वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वसती गृहाच्या आवारात जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केले. वडेट्टीवार वसती गृहामध्ये पोहोचले असताना तिथे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि विरोधी पक्षनेत्यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना गृहमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “अनाथ मुलींना वसती गृहात कोंडून मारहाण करणे, धमकावणे आणि त्यांच्यावर खोटे व्हिडिओ बनवण्यासाठी दबाव आणणे हा अत्यंत नीच प्रकार असून ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची हुकूमशाही विचारसरणी आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला. उद्या पुण्यात होणारा राहुल गांधी यांचा ‘छात्र की गूंज’ कार्यक्रम उध्वस्त करण्यासाठी आणि त्याला गालबोट लावण्यासाठी सत्ताधारी भाजप, आरएसएस आणि अभावीपणे रचलेले हे एक पूर्वनियोजित षडयंत्र आहे, असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला. राहुल गांधींच्या वाढत्या प्रभावाला सरकार इतके घाबरले आहे कि त्यांच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी तब्बल तीस अटी लादल्या आहेत, आणि आता पोलिसांचा गैरवापर करून कार्यकर्त्यांवर दंडे चालवले जात आहेत, असे सांगत त्यांनी गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वसती गृहामध्ये तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी निष्पक्ष भूमिका घेण्याऐवजी काँग्रेस कार्यकर्त्यांनाच टार्गेट केल्याचा आरोप काँग्रेसने केला . “ज्या ठिकाणी देशातील मुली सुरक्षित नाहीत, तिथे मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी धावून जाणे हे आपले कर्तव्यच मानले आहे आणि तिथे काँग्रेस येणारच,” अशी ठाम भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडली. मात्र, पोलिसांनी न्याय मागणाऱ्या काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांवर आणि एनएसयूआयच्या मुलांवर निर्घृणपणे लाठीमार केला आणि त्यांना मारहाण करत तिथून हुसकावून लावले असा आरोप करण्यात आला. पोलिसांच्या या भूमिकेवर विजय वडेट्टीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. आज रात्रीपर्यंत जर मुलींना डांबणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई झाली नाही, तर उद्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते तीव्र धरणे आंदोलन करतील आणि याची सर्व जबाबदारी पुणे पोलिसांची असेल, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील आपली बाजू मांडली असून काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी वसती गृहाच्या एका विद्यार्थिनीशी अत्यंत गैरवर्तन केले आणि तिला खोट्या आंदोलनात बसवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसकडून केवळ राजकीय फायद्यासाठी आणि राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खोटे आरोप करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा अभाविपने केला आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे आणि वाढत्या तणावामुळे पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, पोलिसांच्या भूमिकेकडे आणि दोषींवर होणाऱ्या संभाव्य कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















