पुणे- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. मात्र, ज्यांचे चित्रपट कधीच चालले नाहीत अशा बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही लोकांना कोविड सेंटर आणि सॅनिटायझर तयार करण्याचे कंत्राट दिले जात आहे असा आरोप भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळण्यात अपयश येत असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फायर ऑडिटची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही हे फायर ऑडिट झालेले नाही. परिस्थिती बदलली नसल्याने आगीच्या दुर्घटनेत निष्पापांचे बळी जात आहेत. त्याची जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.
बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही व्यक्तींना कोरोनासंबंधीच्या कामांची कंत्राटे देऊन ठाकरे सरकार स्वत:चे उखळ पांढरे करत असल्याचा आरोप करीत बॉलीवूडमधील काही लोकांना फायदा मिळवून देण्यासाठीच ही कंत्राटे काढली जात असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीवरूनही सरकारला लक्ष्य केले. राज्यात इमारती, रुग्णालय आणि मॉल्समध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. इमारतींमध्ये अग्निरोधक सुविधा उपलब्ध नसल्याने आगीवर नियंत्रण मिळण्यात अपयश येत असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फायर ऑडिटची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही हे फायर ऑडिट झालेले नाही. परिस्थिती बदलली नसल्याने आगीच्या दुर्घटनेत निष्पापांचे बळी जात आहेत. त्याची जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी निलेश राणे यांनी केली.