तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे- प्रकाश आंबेडकर

Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

पुणे(प्रतिनिधि) महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलेल्या विधानाचा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला आहे. आंबेडकरांनी ही माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट केली आहे. त्यात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे.तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार देऊन केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपची मदतच केली आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित आणि एमआयएम काम करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहे, असा  आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे.

अधिक वाचा  कोश्यारी खासगीत म्हणतात की,मला आता माझ्या राज्यात परत जायचं आहे- अजित पवार

त्यावर आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का?महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? असे प्रश्न तुषार गांधी यांना विचारले आहेत.

तसेच आंबेडकर यांनी म्हटले की, जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love