Jain Boarding Land Sale Controversy : पुणे(प्रतिनिधी)–मॉडेल कॉलनी (Model Colony) येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट (Seth Hirachand Nemchand Smarak Trust) च्या जमिनीच्या विक्रीवरून सुरू असलेल्या ऐतिहासिक संघर्षात काल रात्री (दि. २६ ऑक्टोबर २०२५) एक मोठे आणि नाट्यमय वळण आले आहे. जैन समाजाच्या तीव्र धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विरोधामुळे, जमीन खरेदीदार मे. गोखले लँडमार्क एलएलपी (Gokhale Landmarks LLP) चे भागीदार विशाल गोखले यांनी या संपूर्ण व्यवहारातून माघार (Withdrawal from the Transaction) घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्रस्टच्या चेअरमन/व्यवस्थापकीय विश्वस्तांना पत्र पाठवून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, गोखले बिल्डर्सनी केवळ पत्र पाठवून माघार घेतल्याच्या घोषणेवर सकल जैन समाजाने समाधान न व्यक्त करता, लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
बिल्डरच्या माघारीचे कारण
विशाल गोखले यांनी आपल्या पत्रात माघारीसाठी ‘नैतिक जबाबदारी’ (Out of moral responsibility) हे प्रमुख कारण दिले आहे. धर्मादाय आयुक्तांच्या (Hon’ble Charity Commissioner) आदेशानुसार (दि. ०४/०४/२०२५) संपूर्ण प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण करूनही, व्यवहारात अनियमितता असल्याच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवांमुळे (false and misleading rumours) त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेचे मोठे नुकसान झाले. यामुळे समाजात अनावश्यक सामाजिक अशांतता निर्माण झाली.
या संपूर्ण प्रकरणात वाढलेला धार्मिक, सामाजिक आणि राजकीय हस्तक्षेप लक्षात घेऊन, तसेच जैन समाजाच्या सदस्यांच्या नम्र विनंतीवरून आणि त्यांच्या धार्मिक भावनांचा आदर (deference to their religious sentiments) राखण्यासाठी त्यांनी आपला निर्णय बदलल्याचे (reconsider my position) नमूद केले आहे. समाजाच्या कोणत्याही घटकाच्या श्रद्धा दुखावल्या जातील, असे काम पुढे न नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
गोखले यांनी ट्रस्टकडे ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेला ‘विक्री करार आणि पॉवर ऑफ अटर्नी’ (Sale Deed & POA) तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, व्यवहारापोटी ट्रस्टला दिलेले २३० कोटी रुपये (दोनशे तीस कोटी रुपये फक्त) इतकी रक्कम परत करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
सकल जैन समाज आक्रमक: ‘पूर्ववत’ स्थिती होईपर्यंत लढा सुरूच
गोखले बिल्डर्सनी केवळ पत्र पाठवून माघार घेतल्याच्या घोषणेवर सकल जैन समाजाने समाधान न व्यक्त करता, लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. काल रात्री उशिरा जैन बोर्डिंगमध्ये देशातील सुमारे ८६ संघटनांच्या प्रतिनिधींची (86 different organizations) महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत आपला ठाम निर्धार व्यक्त केला.
ते म्हणाले, “गोखले बिल्डर्सनी पत्र लिहिले म्हणून आम्ही समाधानी नाही,” ३.५ एकर मालमत्तेतील एक इंचही जमीन द्यायला आम्ही तयार नाही. समाजाची मुख्य मागणी आहे की, या जमिनीवर सध्या असलेले बिल्डरचे नाव पूर्णपणे हटवून, ट्रस्टचे नाव पुनर्संस्थापित (Trust’s name is reinstated) झाले पाहिजे. म्हणजेच, ही मालमत्ता जशीच्या तशी ‘एचएनडी बोर्डिंग’च्या (HND Boarding) मालकीची पूर्ववत झाल्याशिवाय, हा लढा थांबणार नाही. व्यवहार पूर्णपणे रद्द करण्यासाठी ट्रस्टींनीही तात्काळ पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ट्रस्टींना ‘३० ऑक्टोबर’चा अंतिम इशारा; १ नोव्हेंबरपासून उपोषण
सकल जैन समाजाने या संपूर्ण प्रकरणाला आता निर्णायक वळण देत ट्रस्टच्या विश्वस्तांना थेट अंतिम इशारा दिला आहे.हा व्यवहार ३० ऑक्टोबरच्या आत (by October 30th) पूर्णपणे रद्द (completely cancelled) न झाल्यास, परमपूज्य आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज हे १ नोव्हेंबरपासून उपोषणाला (fast from November 1st) सुरुवात करतील, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे.
ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकार आणि ट्रस्टींनी तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा, उपोषण थेट ट्रस्टींच्या दारात जाऊन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. जोपर्यंत अंतिम यश मिळत नाही आणि ट्रस्टचे नाव पूर्ववत लागत नाही, तोपर्यंत देशभरातील आणि पुण्यातील सर्व आंदोलन कृती (Activity) सुरूच राहणार आहेत.
दरम्यान, बैठकीनंतर बोलताना राजू शेट्टी यांनी त्यांना खासदार मुरलीधर मोहोळ यांचा रात्री ९:३० च्या दरम्यान फोन आला आणि त्यांनीच गोखले बिल्डर्सनी पत्र पाठवल्याची माहिती दिल्याचे सांगितले.















