मुंबई- मुंबई (Mumbai) वाचवण्यासाठी मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी काही ‘मालकांचे नोकर’ प्रयत्नशील असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. “राज्याच्या मनात आहे तेच मी करेन,” असे सूचक विधान करत, ठाकरे यांनी संभाव्य ठाकरे एकजुटीकडेही लक्ष वेधले. मात्र, ही मराठी शक्ती एकत्र येऊ नये म्हणून बाहेरील शक्तींकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला . शिवसेनाप्रमुखांचा ‘ब्रँड’ पुसून टाकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांचे नामोनिशाण महाराष्ट्रातून पुसून टाकू, असा थेट इशाराही त्यांनी मुंबई येथील मेळाव्यात भारतीय जनता पक्षाला (BJP) दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, १९६० साली ज्या मराठी माणसांनी रक्त सांडून मुंबई मिळवली, त्या रक्ताची शपथ घेऊन आम्ही मुंबईला तोडू देणार नाही किंवा तिचे महत्त्व कमी होऊ देणार नाही. मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात आल्यास ‘मालकाच्या मित्राचे’ (आदानी) कसे होणार, या भीतीने मराठी शक्ती एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे हॉटेलमध्ये गाठीभेटी घेत आहेत,” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. ‘शेठजींच्या नोकरांचे नोकर’ आज वर्धापन दिन साजरा करत आहेत, पण त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली.
“तुम्ही जर शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल, तर तुमचं नामोनिशान आम्ही महाराष्ट्राच्या धरतीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही, भाजपचं नामोनिशान पुसून टाकू आम्ही महाराष्ट्रातून,” या शब्दांत त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले. आपली पूर्ण तयारी असल्याचे सांगत, इतरांची तयारी काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ठाकरे यांनी १९९२-९३ च्या मुंबईतील दंग्यांची आठवण करून दिली, जेव्हा शिवसैनिकांनी देशद्रोह्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती असेही नमूद केले.