पुणे—पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे एमआयडीसीतील एसव्हीएस या रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी अटक केलेले कंपनीचे मालक निकुंज शहा यांना न्यायालयाने 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शहा यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आलं. त्यानंतर कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी उरवडे एमआयडीसीतील एसव्हीएस कंपनीत आग लागली. यामध्ये 18 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये 15 महिलांचा समावेश होता. मृतदेह पूर्णतः जळाल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य आहे. त्यामुळेच डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पोलीस आणि ससून रुग्णालयाच्या समन्वयाअभावी दुर्घटनेतील मृतदेह आणखी चार दिवसांनी नातेवाईकांच्या ताब्यात मिळणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे.
मृतदेह आणखी चार दिवसांनी नातेवाईकांच्या ताब्यात मिळणार
डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने देण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवारी संध्याकाळनंतर सर्व नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. आज ते नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा किंवा रविवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. दरम्यान, या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला असून या अहवालानुसार कारवाई करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्यात.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल”,अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
नाहीतर वर्षानुवर्षे आणि महिन्यांनोमहिने असा तमाशा बघण्याची आपल्यावर वेळ येईल- प्रवीण तरडे
आगीची भीषण घटना घडली टी कंपनी मुळशी तालुक्यात येते. प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे हे मुळशीचे आहेत. त्यांनी या घटनेबद्दल संताप व्याक केला आहे.आपले भाऊ बहिण कुठे आणि कशा अवस्थेत काय करतात, याची पाहणी आणि चौकशी आपण केलीच पाहिजे. मुळशी तालुक्याची रग दाखवून देऊ, कंपन्यांत घुसून पाहणी करु असा इशारा देत त्यांनी तालुक्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंचांना यांना विनंती केली आहे.
ते म्हणाले, “आमची जवळची माणसं कुठं काम करतात, हे आम्हाला पाहू द्या. त्यांनी नाही ऐकलं तर आपण कंपन्यांत घुसू… पण ते कुठल्या परिस्थितीत काम करतात, हे आपल्याला पहावंच लागेल. नाहीतर वर्षानुवर्षे आणि महिन्यांनोमहिने असा तमाशा बघण्याची आपल्यावर वेळ येईल