पुणे(प्रतिनिधि)-वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर (Vaishnavi Hagawane Dowry Death Case) मराठा समाजाने या उधळपट्टीवर लगाम घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मराठा समाजाने लग्नसमारंभासाठी एक आचारसंहिताच जाहीर केली असून, यामुळे समाजातील अनाठायी खर्च आणि हुंडापद्धतीला आळा बसणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे शहर पातळीवर लवकरच एक कमिटी नेमली जाणार असून, त्या माध्यमातून जनजागृती केली जाईल.बुधवारी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
अनाठायी खर्चावर लगाम: ‘प्री-वेडिंग’ ते ‘डेस्टिनेशन वेडिंग’ला फाटा
मराठा समाजात गेल्या काही वर्षांपासून लग्नसमारंभात प्रचंड उधळपट्टी केली जाते. श्रीमंती दाखवण्यासाठी काहीजण प्री-वेडिंग शूट (Pre-wedding shoot), डेस्टिनेशन वेडिंग (Destination Wedding), रिसॉर्ट वेडिंग (Resort Wedding), थीम वेडिंग (Theme Wedding), संगीत (Sangeet) अशा संस्कृतीबाह्य गोष्टी करतात. ज्यांना हे परवडते, त्यांचे ठीक आहे; पण अनेकजण ऐपत नसतानाही समाजाला दाखवण्यासाठी हा सगळा भपकेबाजपणा करतात. याच वाढत्या भपकेबाज लग्नांमुळे आणि हुंडापद्धतीमुळे अनेक निष्पाप विवाहितांचे बळी जात असल्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता मराठा समाजातील धुरिणांनी हुंडापद्धतीला लगाम घालण्याचा आणि विवाह सोहळ्यात साधेपणा आणण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी समाजातील नामवंत व्यक्ती, पोलिस अधिकारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांच्या विभाग स्तरावर दबाव समित्या तयार करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हुंड्यासाठी सासरी होणारा छळ आणि आत्महत्याच्या घटना रोखण्यासाठी विवाह सोहळ्यासंदर्भात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन प्राची दुधाने, विकास पासलकर, विराज तावरे, प्रशांत धुमाळ यांसह कार्यकर्त्यांनी केले होते. या बैठकीला इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate), श्रीकांत शिरोळे (Shrikant Shirole), प्रशांत जगताप (Prashant Jagtap), अरविंद शिंदे (Arvind Shinde), अंकुश काकडे (Ankush Kakade), राहुल पोकळे (Rahul Pokale), अॅड. पूजा झोळे (Adv. Pooja Zole), अजय भोसले (Ajay Bhosale), प्रशांत कुंजीर (Prashant Kunjir) यांसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या आचारसंहितेतील महत्त्वाचे नियम
मराठा समाजाने जाहीर केलेल्या नव्या आचारसंहितेत अनेक महत्त्वाचे नियम समाविष्ट आहेत, जे समाजाला योग्य दिशा देतील:
हुंडाबंदी: हुंडा देणार नाही व घेणार नाही.
सामाजिक बहिष्करण: ज्या कुटुंबात महिलांचा छळ होतो, हुंडा घेतला जातो, त्या कुटुंबाशी समाज रोटी-बेटी व्यवहार करणार नाही आणि ती कुटुंबे मराठा समाजातून बहिष्कृत केली जातील.
माहेरचा आधार: ज्या महिलेचा सासरच्या माणसांकडून छळ होत असेल, तिचे माहेरचे लोक ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहतील.
साधे विवाह: कोणत्याही प्रकारचे अनावश्यक प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे साधेपणाने व वेळेवर केले जातील.
कौटुंबिक मानपान: मानपानाचे सामाजिक प्रदर्शन केले जाणार नाही. जावई मान, इत्यादी सर्व मान कौटुंबिक स्वरूपात केले जातील.
सामूहिक विवाह: मराठा समाज सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देईल.
एकच वक्ता: विवाह सोहळ्यात केवळ एकच व्यक्ती आशीर्वादाचे स्वरूपातील भाषण देईल.
कमी पाहुणे: विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांमध्ये पार पडेल.
खर्चाला फाटा, शिक्षणाला प्राधान्य: विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून, मुलगा-मुलगी यांच्या नावे एफडी (FD) केली जाईल, तसेच काही रक्कम गरजवंतांना मदत स्वरूपात केली जाईल. मुला-मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल.
डीजेबंदी व प्रदूषणमुक्त: वरातीमधील कर्णकर्कश डीजेचा आवाज व त्यावरील बीभत्स नृत्य बंद केले जाईल. तसेच, प्रदूषणयुक्त फटाके वाजवले जाणार नाहीत.
प्री-वेडिंग शूट टाळा: प्री-वेडिंग शूट टाळले जातील.
खर्चाची विभागणी: विवाह सोहळ्याचा खर्च वर व वधू पक्षाने अर्धा-अर्धा करावा.
अनुचित प्रकार रोखण्यासाठी समितीची मध्यस्थी
समाजातील काही जबाबदार व कर्तव्यदक्ष व्यक्तींची समिती किंवा मंडळ स्थापन केले जाईल. यामध्ये सहभागी कोणतीही व्यक्ती मराठा समाजाचा वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय, व्यावसायिक, सामाजिक, इत्यादी गैरफायदा घेणाऱ्या मानसिकतेची नसावी, याची पूर्ण खात्री केली जाईल. गावागावात अशी समिती नेमून काही अनुचित प्रकार होत असल्यास मध्यस्थी करून ते रोखले जातील.
या निर्णयामुळे मराठा समाजात एक सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे. पिढ्यानपिढ्यांची मानसिकता बदलण्यास काही कालावधी जाईल; यासाठी आवश्यक जनजागृतीसाठी सातत्याने मराठा समाज प्रयत्न करेल. आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा समाजाने गौरव करावा आणि समाजातील आदर्श विवाह सोहळ्यांचे अनुकरण करण्यात येईल, असेही या बैठकीत ठरवण्यात आले. येणाऱ्या काळात मराठा समाज इतर सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व नियमावली व आचारसंहिता यावर चर्चा करून, संपूर्ण समाजासाठी त्याची अंमलबजावणी करण्याकरिता प्रयत्न करेल, असे आवाहनही करण्यात आले.