Rohit Pawar : “विमान खराब होते तर दादांना का दिले?” रोहित पवारांचा प्रशासनाला जाब; केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Ajit Pawar death probe Rohit Pawar
Ajit Pawar death probe Rohit Pawar

Rohit Pawar : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि नेते युगेंद्र पवार यांनी गुरुवारी बारामती शहर पोलीस ठाण्यात धडक देत, या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मोठ्या संख्येने समर्थक आणि सुमारे १०० वकिलांच्या उपस्थितीत पवार बंधूंनी पोलीस प्रशासनाकडे आपला अर्ज सुपूर्द केला. हा अपघात नसून घातपाताचा संशय असल्याचे सांगत, नागरी विमान वाहतूक संचालनालय (डीजीसीए) आणि अपघातग्रस्त विमानाचे संचालन करणाऱ्या ‘व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (व्हीएसआर) या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि विमान नियोजनाची जबाबदारी असलेल्या ‘रो’ (Ro) नावाच्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

रोहित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, २४ फेब्रुवारी रोजी डीजीसीएने एक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये व्हीएसआर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या सिद्ध होत आहे. या कंपनीच्या मालकीच्या सात विमानांपैकी दोन विमानांचे अपघात झाले असून, उर्वरित पाच विमाने डीजीसीएने सुरक्षेच्या कारणास्तव जमिनीवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. “जर ही सर्व विमाने खराब होती, तर अजित दादांच्या प्रवासासाठी खराब विमान का दिले गेले? हा केवळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक केलेला कट?” असा गंभीर सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ‘रो’ कंपनीच्या एका व्हॉट्सॲप चॅटचा हवाला देत त्यांनी सांगितले की, खराब हवामानाची माहिती असूनही अधिकाऱ्यांनी दादांना प्रवासासाठी हिरवा कंदील दिला होता.

अधिक वाचा  राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन

यापूर्वी बुधवारी रोहित पवार यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ‘झिरो एफआयआर’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे तो स्वीकारला गेला नाही. बारामतीमध्येही पोलिसांनी तांत्रिक तपासाचे आणि सीआयडी चौकशी सुरू असल्याचे कारण देत एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. पोलिसांवर मोठ्या राजकीय व्यक्तीचा दबाव असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, “पुण्यात कबुतर चोरीला गेल्यास गुन्हा दाखल होतो, मात्र राज्याच्या इतक्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूनंतर महिना उलटूनही एफआयआर का होत नाही?” असा सवाल उपस्थित केला.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी

या अपघाताचा तपास सध्या ‘विमान अपघात तपास ब्युरो’ (एएआयबी) तांत्रिक दृष्टिकोनातून करत आहे, तर महाराष्ट्र सीआयडी अकस्मात मृत्यूची चौकशी करत आहे. मात्र, रोहित पवार यांनी केवळ तांत्रिक तपास पुरेसा नसून क्रिमिनल अँगलने (गुन्हेगारी दृष्टिकोनातून) चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. विमान कंपनीचे सत्ताधारी नेत्यांशी आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी असलेले व्यावसायिक संबंध असल्याचा दावा करत, त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

अधिक वाचा  हिरानंदानी-क्रिसाला डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विकासातून हिंजवडी, पुणे येथे १०५ एकरचे इंटिग्रेटेड टाउनशिपचे अनावरण

पुढील पाऊल म्हणून रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी पुण्याच्या सीआयडी मुख्य कार्यालयात जाऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेण्याचे ठरवले आहे. तसेच येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार हा मुद्दा लावून धरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “आम्हाला या विषयावर राजकारण करायचे नाही, तर केवळ आमच्या लाडक्या दादांना न्याय मिळवून द्यायचा आहे,” अशा भावना रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love