नवी दिल्ली – अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टमध्ये सध्या मोठ्या प्रशासकीय उलथापालथी सुरू असून, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. मंदिराच्या देणगीमध्ये झालेल्या आर्थिक अनियमितता आणि चोरीच्या प्रकरणांनंतर हा निर्णय घेतला जात असल्याचे समजते. त्यांच्या जागी आता विश्व हिंदू परिषदेचे नेते बजरंग लाल भांगडा आणि कृष्ण मोहन यांच्याकडे ट्रस्टची मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची चिन्हे आहेत.
बजरंग लाल भांगडा हे ‘नालको’ (NALCO) चे माजी अध्यक्ष राहिले असून त्यांना व्यावसायिक कामकाजाचा मोठा अनुभव आहे, त्यामुळेच सध्या मंदिराच्या अंतर्गत व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
राम मंदिर परिसरात आज होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीत एसआयटीचा (SIT) अंतरिम अहवाल, २०२५-२६ चा ऑडिट रिपोर्ट आणि नवीन सीईओची नियुक्ती यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीपूर्वी ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांची वैदेही भवन येथे कृष्ण मोहन आणि बजरंग लाल भांगडा यांनी भेट घेतली, जे ट्रस्टमध्ये मोठ्या बदलांचे संकेत मानले जात आहेत. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर ट्रस्टच्या इतर सदस्यांमध्येही नाराजी होती. विशेषतः चंपत राय यांनी कोणाचाही सल्ला न घेता मनमानी कारभार केल्याचा आणि व्यावसायिकता न पाळल्याचा आरोप काही सदस्यांनी अनौपचारिकपणे केला आहे.
मंदिराच्या देणगीमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे. एसआयटीच्या अहवालानुसार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तब्बल ७० वेळा चोरीच्या घटना कैद झाल्या आहेत. चोरीची ही पद्धत इतकी टोकाची होती की, काही लोक चक्क पायमोज्यांमध्ये पैसे लपवून किंवा बाथरूममध्ये पैसे दडवून ते बाहेर नेत असत. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यात प्राथमिक शिक्षक, माजी मेकॅनिक आणि बँक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अवघ्या १५ हजार रुपये पगार असणाऱ्या अनुकल्प मिश्रा नावाच्या कर्मचाऱ्याने अवघ्या काही महिन्यांत ६५ लाखांचे घर बांधले, महागड्या एसयूव्ही गाड्या बुक केल्या आणि जमिनी खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी या प्रकारावर तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटले की, कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेशी झालेला हा खेळ हृदयद्रावक आहे. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांना बँक व्यवहारांपासून आणि महत्त्वाच्या ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (SOP) पासून दूर ठेवण्यात आले होते. एसबीआय बँकेसोबत झालेल्या करारावर केवळ अनिल मिश्रा यांच्या स्वाक्षऱ्या होत्या आणि कोषाध्यक्षांना धनादेश पुस्तकावरही अधिकार नव्हते. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी केवळ आपल्या विश्वासातील आणि व्यावसायिक अनुभव नसलेल्या लोकांची भरती केल्यामुळेच हा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे.















