पुणे: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने पुणे आणि मुंबई दरम्यानच्या जनजीवनावर मोठा परिणाम केला असून, मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्स्प्रेस वे), जुना महामार्ग आणि रेल्वे सेवा अशा तिन्ही स्तरांवर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे प्रशासनाने नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा आणि कर्जत दरम्यानच्या घाट क्षेत्रात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही ठिकठिकाणी दरडी आणि मातीचा ढिगारा आल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन्ही महामार्गांवरील वाहतूक तात्काळ थांबवली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी, जोपर्यंत मार्ग पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत वाहतूक पूर्ववत करणे शक्य नसल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी आपला प्रवास तूर्तास पुढे ढलावा. ज्या प्रवाशांनी आधीच नियोजित प्रवास केला आहे. कोणतीही अफवा न पसरवता किंवा अफवांवर विश्वास न ठेवता, केवळ जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत अपडेट्सवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून, मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे प्रशानाकडून कळविण्यात आले आहे.
रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले
मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील टनेल क्रमांक ४० (Tunnel No. 40 – BB EMD) परिसरात दरड कोसळल्याने रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून, युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, सततच्या पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत. परिणामी, मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.















