पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग९)

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास

श्री नारायण बाबांनी प्रयत्नपूर्वक *सन १६८० मध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला,* परंतु त्याच वेळी शिवाजी महाराजांचे नुकतेच निधन झाले होते व महाराष्ट्रात मुस्लिम आक्रमणाची प्रचंड लाट उसळली होती, त्यामुळे पंढरपूरचा मार्ग हा सुरक्षित वाटत नव्हता. त्यामुळे पालखी समवेत जाणारे टाळकरी व वारकरी यांना सतत भय वाटत होते, अशावेळी श्री नारायण बाबांनी *ज्ञानोबा- तुकाराम पालखीत आपल्यासमवेत आहेत, तेव्हा आपणास कळीकाळाचेही भय नाही.* असे सांगून *ज्ञानोबा- तुकाराम* असा मोठ्याने गजर करण्यास सांगितले, हे ऐकून वारकरी व टाळकरी यांनी *ज्ञानोबा -तुकाराम* असा मोठ्याने गजर करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून *ज्ञानोबा-तुकाराम* हा गजर सर्वच पालखी सोहळ्यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. त्या काळात असा गजर केल्याने जणू काही *ज्ञानोबा-तुकाराम आपल्या बरोबरच चालत आहेत अशी भावना वारकऱ्यांची होत असे* व याचा त्यांना आधारही वाटत असे. एक प्रकारे *ज्ञानोबा-तुकाराम या घोषणेचे जनक श्री नारायण बाबाच आहेत* असेच म्हणावे लागेल.

 *श्री.हैबतबाबा आरफळकर हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे.* त्यांचा जन्म सरदार कुळात झाला होता, ते ग्वाल्हेर येथील शिंदे सरकारमध्ये होते. इंग्रजी आमदानीत सन१८१५-१६ चे सुमारास ग्वाल्हेर राज्य खालसा करून संस्थानात रूपांतर झाले, त्यावेळी हैबतबाबा ग्वाल्हेर सोडून साताऱ्यास येण्यास निघाले, वाटेत *त्यांना चोरांनी गाठले व एका गुहेत कोंडून ठेवले.* त्यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वरांचा धावा केला, हैबतबाबा व आणखी काही लोकांना चोरांनी गुहेत कोंडून ठेवले, त्याच सुमारास चोरांच्या टोळीच्या नायकाला मुलगा झाला, त्या आनंदाप्रीत्यर्थ त्यांनी गुहेतून सर्वांना सोडून दिले, त्यात *श्री.हैबतबाबाही सुटले, हा श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे असे त्यांना मनोमन वाटले, त्यांनी प्रवासाचा मार्ग बदलला व ते आरफळला जाण्याऐवजी आळंदीकडे आले.* त्यांनी आळंदीत ज्ञानेश्वरांची आराधना सुरू केली, समाधीसमोर रात्री धुपारतीपासून शेजारतीपर्यंत भजनाचा त्यांचा नित्यक्रम होता, *वारकऱ्यांमध्ये प्रचलित असणारी भजनी मालिका ही त्यांचीच.* श्री विठ्ठलाच्या दरबारी जे नामदेवरायांचे स्थान आहे, तेच हैबतबाबांचे आळंदीच्या दरबारी स्थान आहे, *आळंदीच्या महाद्वाराचे पायरीला हैबतबाबांचीच पायरी म्हणतात.* एवढी उपासना हैबतबाबांनी आळंदीमध्ये केली होती. (क्रमशः)
– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर*
        मो.क्र. ७५८८२१६५२६
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग ५)