अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल : मराठी बरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा

एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते?
एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते?

पुणे- गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची अखेर इच्छापूर्ती झाली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला शारदीय नवरात्रोत्सवाची भेट देत पहिल्या माळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. मराठी बरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात. तसंच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते, यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.

भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की,  “मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे. या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झालं आहे. भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो.”

“माझा मराठाचि बोलु कौतुके.. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अधिक वाचा  पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल १४ जुलै पासून होणार कार्यान्वित : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला आढावा

“माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते पुढे म्हणतात, “अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे सहाय्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!”

अखेर आज तो सुदिन अवतरला.– देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही अनेक वर्षं मागणी केली होती. ती मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली. याबद्दल त्यांचे आभार. हा सोन्याचा दिवस आहे. मा. पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप आभार. मी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केले, पुरावे दिले, महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आणि जगभरातील मराठी लोकांच्या वतीने मी मोदीजींचे आभार मानतो.”

“लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

अधिक वाचा  भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन

“नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हा राजकीय निर्णय आहे – प्रा. रंगनाथ पठारे (अध्यक्ष अभिजात मराठी भाषा समिती)

प्रा. रंगनाथ पठारे (अध्यक्ष अभिजात मराठी भाषा समिती) : हा राजकीय निर्णय आहे. परंतु, आपल्यासाठी, भाषेसाठी आनंदाची गोष्ट आहे. याकरिता खूप काम करता येईल. उशिरा का होईना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. मोठी भाषा आहे. मराठी भाषा प्राचीन भाषा आहे. आत्मविश्वास वाढणे गरजेचे होते. आंतरिक बळ यानिमित्ताने मिळेल. निधीसाठी राज्य सरकारला प्रयत्न करावे लागतील.

मसापने गेली 11 वर्षे जी लोक चळवळ उभी केली तिचे हे यश – प्रा मिलिंद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीच्या सर्व बाबींची पूर्तता प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या समितीने केल्यानंतर सरकार दरबारी हालचाली होण्यासाठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ने  महाराष्ट्रात २०१६साली  प्रथम  लोकचळवळ सुरू केली. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली ४० लेखकांची बैठक, पंतप्रधान कार्यालयाशी सतत केलेला पत्र व्यवहार, परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने शाहूपुरी शाखे मार्फत पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेली एक लाखाहून अधिक पत्रं, यामुळे पंतप्रधान कार्यालयाला दखल घेणे भाग पडले.

अधिक वाचा  ..त्यावर मी काय बोलणार? सुप्रिया सुळे यांची सुनेत्रा पवारांबद्दल व्यक्त केली प्रतिक्रिया

साहित्य परिषदेने राजकीय इच्छा शक्तीला आवाहन करण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. सर्व मराठी खासदारांना पत्र पाठवली त्याचा परिणाम म्हणून लोकसभेत आवाज उठला. आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगावे लागेल मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी साहित्य परिषदेने संस्था म्हणून  जेवढे प्रयत्न केले तेवढे अन्य कोणी केले असतील असे वाटत नाही म्हणून हा आनंद शब्दातीत आहे.  प्रा मिलिंद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे

अभिजात भाषेचा दर्जा मिळायला उशीर झालाडॉ. लक्ष्मीकांत देशमुख (माजी संमेलनाध्यक्ष)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला उशीर झाला. तो पाच वर्षापूर्वीच मिळायला हवा होता. अभिजात भाषेकरिता जे अनुदान मिळते त्याकरिता लागणारा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. म्हणजे त्याचा उपयोग होईल. त्याकरिता केंद्र सरकारने मदत करावी. हरी नरकेंची आज आठवण येत आहे.

 

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love