पुणे -दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भारतीय संस्कृती संवर्धक संस्था व कसबा भाग मोतीबाग नगर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यालय मोतीबाग,शनिवार पेठ या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर पार पाडले.यंदाचे हे शिबिराचे नववे वर्ष होते या शिबिरास, प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक महेश शिंदे उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाचे कार्यवाह राहुल पुंडे,मोतीबाग नगर कार्यवाह प्रमोद वसगडेकर,भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी व कार्यवाह प्रसाद खेडकर यांची मुख्य उपस्थिती होती.एकूण १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबीर संयोजक सागर दरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी महेश शिंदे यांचे भारतमातेची प्रतिमा देऊन स्वागत केले.
रक्तदान शिबीर यशस्वितेसाठी जनकल्याण रक्तकेंद्रचे डॉ रमेश कांबळे,आरती वैद्य,प्राची माने, सारिका नंदकर,गणेश शिंदे,प्राची देशपांडे,किशोर पुट्टेवार,किरण जांभळे, संगीता दळवी,सुनंदा पवार,विश्वनाथ गायकवाड आदींचे सहकार्य लाभले.
ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक महेश शिंदे रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले,”शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घोष आजही अमूल्य आहे.”शिका” म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे,तर विचारशक्ती आणि तर्कशक्ती वाढवणे. “संघटित व्हा” म्हणजे एकत्र येऊन सामूहिक शक्ती साधणे.परंतु “संघर्ष करा” याचा अर्थ अनेकजण चुकीचा घेतात. संघर्ष म्हणजे हातात शस्त्र घेऊन झुंजणे नव्हे,संघर्ष म्हणजे स्वतःमधील उणीवा ओळखून, त्या भरून काढण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण प्रयत्न.
जगात टिकून राहण्यासाठी आणि मोठे होण्यासाठी प्रत्येकाला नवनवीन कौशल्यांची गरज असते.हे कौशल्य मिळवण्यासाठी स्वतःशीच झगडावे लागते,शिकावे लागते, प्रयत्न करावे लागतात. बोलणे, वागणे, निर्णय घेणे, संघटित होणे या प्रत्येक गोष्टीत कौशल्य विकसित करावे लागते.एक पिढी जर योग्य कौशल्यांनी सज्ज झाली, तरच ती पुढच्या पिढीला योग्य दिशादर्शन करू शकते.
म्हणूनच भारताला खऱ्या अर्थाने महान बनवायचे असेल, तर प्रत्येकाने संघर्ष करून नवे कौशल्य मिळवले पाहिजे. संघटन ही केवळ संख्येवर नव्हे, तर तर्कशक्तीवर आणि कौशल्यावर अवलंबून असते.
बाबासाहेबांनी सांगितलेला संघर्ष हा स्वतःला घडवण्याचा संघर्ष आहे. नवीन शिकण्याचा, आत्मविश्वास वाढवण्याचा, आणि समाजासाठी निरंतर परिवर्तन घडवण्याचा संघर्ष आहे. त्यांच्या या शिकवणुकीचे पालन करणे म्हणजेच त्यांना खरी आदरांजली अर्पण करणे असे प्रतिपादन त्यांनी केले.