पुणे(प्रतिनिधि)–भारती कौटुंबिक व्यवस्था ही जगातील सर्वोत्तम आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आदर आणि सहकार्य यावर भर दिला जातो. ही व्यवस्था मजबूत आणि प्रभावशाली व्यवस्था आहे. ती व्यक्तीला सामाजिक आणि भावनिक आधार देते.” असे विचार माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन द्वारे प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांना ‘ विश्वशांती व मानवता समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ ने गौरिवण्यात आले. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली. या प्रसंगी कोर्टात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्धाटन डॉ. कराड व कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनिषा काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुधाकर आव्हाड यांची प्रमुख उपस्थित होती. तसेच पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे, उपाध्यक्ष अॅड स्मिता देशपांडे, अॅड. कल्पना डिसले निकम, सचिव अॅड, प्रथम भोईटे, सहसचिव अॅड. कोमल देशमुख, खजिनदार अॅड. भूषण कुलकर्णी उपस्थित होते.
या प्रसंगी पुणे फॅमिली भूषण पुरस्काराने अॅड. अजीत कुलकर्णी, अॅड. विजया खळतकर, अॅड, प्रफुल्ल भावसार यांचा सत्कार करण्यात आला. तसेस अॅड. रेखा कोल्हटकर यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्याच प्रमाणे डॉ. महेश थोरवे, स्मिता देशपांडे, रोहिणी पवार, वैशाली चांदे, दिपा मॅडम, सुधीर रेड्डी, मर्चंट मॅडम, विद्या मॅडम, सचिन झांडे पाटील, श्वेता पांडे व अंबादास बनसोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” सद्गुणांची पूजा हीच ईश्वरपूजा आहे. परंतू आज या देशाला जाती धर्माचा शाप लागलेला आहे. अशावेळेस विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून मानवकल्याणासाठी कार्य करावे. स्वाभिमान, सत्व आणि कर्तव्याची जाण सर्वाना हवी आहे. यासाठी वकिलांनी राष्ट्रीय स्तरावरील राउंड टेबल कॉन्फरन्स घ्यावी. मानवाचे अंतिम सत्य काय आहे. हे ओळखावे परंतू व्यक्ती हा चुकीच्या दिशेने जाता कामा नये. अशा वेळेस लायब्ररीची दिशा काय असेल हे पहावे.”
न्यायाधीश मनिषा काळे म्हणाल्या,” कौटुबिक न्यायालयाने आज ज्ञानाचे दरवाजे उघडले आहे. ज्ञान ही अशी गोष्ट आहे जीची भूक कधीही थांबत नाही त्यामुळे सतत वाचन सुरू ठेवावे.”
अॅड. सुधाकर आव्हाड म्हणाले,” पुस्तक हे देशाच्या संस्कृतीचे मस्तक असते. या देशात वाचन संस्कृती ही ऋग्वेदापासून होती. कालानुरूप वाचन संस्कृती वाढत असतांना १८२९ साली लायब्ररीचा उपक्रम सुरू झाला. शब्द संग्रह वाढविण्यासाठी सतत वाचन करावे. शब्द विसरून जात असतील तर लिखाण करावे. प्रत्येक व्यक्ती ने सर्वात प्रथम श्रवण, मनन, चिंतन, लेखन आणि बोलणे करावे.”
अॅड. गणेश कवडे यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, पुण्यात १९८९ या वर्षी कौटुंबिक न्यायालयाची स्थापना झाली. येथे वाचनालय सुरू करण्यासाठी बर्याच अडचणी आल्यात पण उच्च न्यायालयाच्या परवानगीने चला जागा मिळाली आणि अत्याधुनिक ई लाइब्ररीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. हे कोर्ट देशातील एक सर्वोत्तम मॉडल आहे.”
सूत्रसंचालन अॅड. कोमल देशमुख यांनी केले. अॅड. भूषण कुलकर्णी यांनी आभार मानले.