संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगिनी श्री संत मुक्ताबाई यांचे समाधीस्थान जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद येथे आहे, या स्थानाला अलीकडच्या काळात मुक्ताईनगर म्हणून ओळखले जाते. संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात सन १८८१ मध्ये करण्यात आली, ही पालखी आणण्याची प्रथा श्री झेंडुजी बुवा यांनी सुरू केली. प्रथम या पालखी बरोबर कमी लोक येत असत, परंतु पुढच्या काळात या पालखीबरोबर येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. या पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध पंचमीला होते व ही पालखी ३६ दिवसांनंतर पंढरपूरला आषाढ शुद्ध दशमीला येऊन पोहोचते. ही पालखी पंढरपूरला येताना एदलाबाद म्हणजेच मुक्ताईनगर – मलकापूर – बुलढाणा – जालना – बीड – चौसाळा – पाली – भूम – माढा – करकंब- वाखरी- विसावा – पंढरपूर या मार्गाने येते तर परतीचा प्रवास देखील याच मार्गाने होतो, परतीच्या प्रवासासाठी वीस दिवस लागतात.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व इतर प्रमुख संतांच्या पालखी सोहळ्याच्या माहितीनंतर आपण पंढरपुरात चालणाऱ्या रथोत्सवाची माहिती पाहुयात. विजयनगर याठिकाणी पंढरपूरातून नेलेली विठ्ठल मूर्ती भानुदास महाराजांनी सन १५१३ मध्ये परत आणली. विठ्ठलाची मूर्ती विजयनगर या ठिकाणी असल्यामुळे हे मंदिर मूर्तीविनाच होते. संत भानुदास महाराजांनी प्रयत्नपूर्वक ही मूर्ती विजयनगरवरून आणल्यानंतर सन १५१३ मध्ये पंढरपुरात दाक्षिणात्य पद्धती प्रमाणे असणाऱ्या दुमजली मोठ्या लाकडी रथामध्ये ही मूर्ती घालून पंढरपूर शहराच्या प्रदक्षिणा मार्गाने या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली, ही मिरवणूक म्हणजेच पहिली रथयात्रा. पुढच्या काळामध्ये ही रथयात्रा फक्त कार्तिकी वारीलाच निघत असे. पुढे तीस ते चाळीस वर्षे ही रथयात्रा निघत राहिली. या यात्रेसाठी लागणारा रथ कासेगावच्या देशमुख यांनी तयार करून दिला होता. पुढच्या काळात पाच बहामनी राज्यांच्या आपआपसांमध्ये चाललेल्या लढाया व महाराष्ट्रातील औरंगजेबाचा अंदाधुंदीचा काळ यामुळे ही रथयात्रा बंद पडली. (क्रमशः)
– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र. ७५८८२१६५२६